हिमांशू
बॉलिवूडमधल्या पाचपैकी एका सिनेमात हिरो पोलीस अधिकारी असतो, असं म्हटल्यास प्रमाण फारसं चुकणार नाही. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तर हे प्रमाण याहून अधिक असतं. पोलीस अधिकाऱ्यांची वेगवेगळी रूपं पडद्यावर दाखवली जातात.
गुंडांचा नायनाट करण्यासाठी अनेकदा हिरो वर्दीच्या मर्यादा ओलांडून स्वतःच गुंड बनतो. कमांडोप्रमाणं जमिनीवर, पाण्यात, पाण्याखाली आणि हवेत अशा चारही ठिकाणी मुकाबला करण्याइतका तो सक्षम दाखविला जातो. दहा-बारा हत्यारबंद गुंड म्हणजे त्याच्यासाठी अगदीच किरकोळ आव्हान! ते सगळे मिळून हिरोवर कधीच एकत्रितपणे हल्ला करत नाहीत. हिरोचा मार खायला एकेकजण आळीपाळीने पुढे येतो.
जरी सगळे एकदम आलेच तरी त्यांना आस्मान दाखवायची ताकद हिरोकडे असते. आधुनिक तंत्रज्ञानानं तर हिरोला इतकं शक्तिशाली बनवलंय, की तो “वन मॅन आर्मी’ ठरलाय. पडद्यावरची अशी दृश्य अतार्किक असली तरी लोकांना बघायला आवडतात. खाकी वर्दी घातलेल्या आपल्या लाडक्या हिरोची एन्ट्री झाली की पब्लिक शिट्ट्या मारतं. परंतु खरा पोलीस वर्दीतल्या वर्दीत बराच घुसमटलेला असतो. त्याच्या या घुसमटीला वाचा फोडण्याचाही प्रयत्न काही चित्रपटांमधून झालाय. परंतु गुन्हेगारांचा नायनाट व्हावा म्हणून कोणतंही आव्हान पेलण्यासाठी चोवीस तास सतर्क असणारा पोलीसच लोकांना पडद्यावर पाहायला अधिक आवडतो. खरा पोलीस मात्र असा “सुपरहिरो’ नाहीये आणि लोकांच्या हल्ल्यांबरोबरच तो अवहेलनाही सहन करतोय.
मुंबईत एका महिलेनं ट्रॅफिक हवालदारावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ बराच व्हायरल झालाय आणि त्या निमित्तानं पोलिसांवरील हल्ल्यांचा मुद्दाही पुन्हा गरम झालाय. काळबादेवी परिसरात पोलिसाने हेल्मेट घातलं नाही म्हणून एका दुचाकीस्वाराला हटकलं. परंतु हवालदाराने शिवी दिल्याचा आरोप करून दुचाकीस्वाराच्या सोबत असलेल्या महिलेनं भररस्त्यात पोलिसावर हल्ला चढवला. मारहाण करून त्याचे कपडे फाडले. या घटनेच्या एकच दिवस आधी अंबरनाथमध्ये पोलिसावर दोघांनी तलवारीने वार केले होते. वसई-विरारमध्येही काही दिवसांपूर्वी अशी घटना घडली होती.
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांवर हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. लोकांमधला संयम कमी झालाय म्हणावं की पोलिसांबद्दल अपेक्षित असणारी आदरयुक्त भीती नाहिशी झालीय म्हणावं, हेच समजेनासं झालंय. पोलिसांवर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमागे नेमकी कोणती मानसिकता असते, हे शोधून काढणं आव्हानात्मक आहेच. परंतु त्याहीपेक्षा अधिक धोकादायक मानसिकतेचं दर्शन घडवणारी गोष्ट म्हणजे अशा हल्ल्यांचं मोबाइलवर केलं जाणारं चित्रण.
मोबाइलमधल्या कॅमेऱ्याचे मेगापिक्सल वाढत चाललेत आणि त्याच प्रमाणात लोकांच्या संवेदनशीलतेचे मेगापिक्सल कमी होत आहेत, हेच यावरून दिसून येतं. रस्त्यावरचा अपघात असो, मारामारी असो, दंगल असो वा पोलिसांवर झालेला हल्ला असो. आपण त्याचाही “सिनेमा’च बनवतोय.
आपल्या हातातल्या मोबाइलमध्ये दररोज वेगवेगळी डिजिटल उपकरणं येतायत. त्यांचा फायदा आपल्याला होतोय. परंतु मोबाइल ज्या हातात असतो, तो एका माणसाचा हात आहे, हेच आपण विसरून जाणार असू तर मामला गंभीर आहे. रस्त्यावर अशा असंख्य घटना घडतात, जिथं आपण मदतीसाठी पुढे सरसावणं खरंतर अपेक्षित आहे. परंतु एकतर दुर्लक्ष करून आपण पुढे निघून जातो किंवा अशा प्रकारे घटनेचं चित्रीकरण करत थांबतो. मात्र, भविष्यात त्याचा पश्चात्ताप झाल्यावाचून राहणार नाही.