हिमांशू
भूतबाधा, लागीर, भानामती वगैरे शब्द आपल्याला नवीन नाहीत. एखादी वस्तू बघता-बघता दिसेनाशी झाली तरी आपण “भुताटकी झाली की काय,’ असे म्हणतो. खरे तर आपणच डाव्या-उजव्या हाताने ती कुठेतरी ठेवलेली असते आणि यथावकाश तिचा शोध लागतो. कुणाच्या घरावर रात्री-अपरात्री दगड येऊन पडतात, कुणाकडे तरी अचानक अन्नात माती पडू लागते, कुणाच्या दारात कापलेले लिंबू येऊन पडते, अंगणात काळी बाहुली येऊन पडते आणि मग मंत्र-तंत्र सुरू होतात. एवढेच नव्हे तर एखाद्याच्या प्रगतीत वारंवार अडथळे येऊ लागले, व्यवसायात वारंवार तोटा होऊ लागला, तरी आपल्यावर करणी केल्याचा, लागीर झाल्याचा संशय संबंधिताला येतो. आता हेच पाहा ना, नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे कामकाज जोपर्यंत जुन्या इमारतीत सुरू होते, तोपर्यंत सगळे कसे सुरळीत चालले होते.
परंतु मुख्यालयाच्या नव्याने बांधलेल्या इमारतीत कामकाज सुरू झाले आणि अचानक घसरण सुरू झाली. हे आमचे नव्हे, खुद्द बॅंकेचे संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या जागेवर नवीन इमारत उभारली, तिथे म्हणे पूर्वी कब्रस्तान होते आणि त्यामुळेच बॅंकेला उतरती कळा लागली. केवळ तशी शंका घेऊन ही मंडळी थांबली नाही, तर बॅंकेचे स्थलांतर पुन्हा जुन्या इमारतीत करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या. हे समजल्यानंतर बॅंकेवर चौफेर टीकाही सुरू झाली.
गेल्या आठवड्यात या भुताटकीची बरीच चर्चा झाली. माध्यमांनी नोंद घेतली, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर संस्थांनी शाब्दिक हल्ले सुरू केले. एवढेच नव्हे तर काहीजणांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे याविषयी तक्रारसुद्धा नोंदवली. या अगम्य भुताटकीची चर्चा सुरू झाल्यानंतर पूर्वीच्याही काही कहाण्या उघड झाल्या. एका बातमीनुसार, नव्या इमारतीचे उद्घाटन झाले, त्याच्या आदल्याच रात्री तिथे एक भगत आणून शांती करून घेतली होती म्हणे! पूर्वी तिथे असलेल्या कब्रस्तानची जर त्याच वेळी धास्ती वाटली होती, तर शांती केल्यानंतर ती कमी व्हायला हवी होती. पण तसे झाले नाही. बॅंकेची कर्जं वाढत गेली आणि संबंधितांची चिंताही! या बॅंकेची थकबाकी 2700 कोटींच्या घरात आहे आणि वसुलीचे प्रमाण फक्त 5 ते 10 टक्के आहे, असे सांगितले जातेय. ही खरोखर “भुताटकी’च आहे! ती केवळ सहकारी बॅंकांनाच नव्हे तर सरकारी बॅंकांनाही लागलीय.
लाखो कोटींची ही भुताटकी उतरवणारा मांत्रिक अजून आपल्याला भेटायचाय. आपल्या देशात कोट्यधीशांची संख्या कशी वाढतेय आणि हेच आर्थिक उन्नतीचे लक्षण मानणे किती आवश्यक आहे, असे “मंत्र’ पुटपुटणारे जागोजागी भेटतील; पण बॅंकांमधला खड्डा कसा भरणार, हा प्रश्न अनुत्तरितच!
एकाच वर्षात 5 हजार कोट्यधीश भारताला रामराम ठोकून परदेशांत स्थायिक झाल्याची बातमी परवाच वाचली. हे “निघून’ गेलेले लोक. याखेरीज “पळून’ जाणारे आहेतच! बॅंकांमध्येच नव्हे तर देशातच लक्ष्मी टिकेनाशी झालीये. ही “भुताटकी’च नव्हे का? देशात कमावून परदेशात स्थायिक होण्याची मानसिकता जगात सर्वत्र आढळते. सगळेच काही कर्जं बुडवून जात नाहीत; पण पैसा टिकत नाहीये, हे खरे. सामान्यांचा पैसा वेगवेगळ्या मार्गांनी गायब करणाऱ्या यंत्रणेत खरी “भुताटकी’ आहे!