हिमांशू
“कामातुराणां न भयं न लज्जा’ असं म्हटलं गेलं असलं तरी इतकं धारिष्ट्य अखेर येतं कुठून, हे खरोखर कोडं आहे. कोणत्याही कायद्याला, कारवाईला, पोलिसांना आणि मुख्य म्हणजे समाजाच्या संतापालाही भीक न घालता महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांची जी मालिका सुरू आहे, ती पाहून हादरायला होतं.
ज्यांच्या घरात पोरीबाळी आहेत, त्यांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटना दररोज घडतायत. जळगाव जिल्ह्यात नुकतीच उजेडात आलेली घटना क्रौर्याची परिसीमा दाखविणारी आहे आणि पोलिसांनी जो प्राथमिक निष्कर्ष काढलाय, तो ऐकून नॉर्मल माणसाच्या काळजाला घरं पडल्यावाचून राहणार नाहीत. रावेर तालुक्यातल्या बोरखेडा गावात अवघ्या तेरा वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार झाला असल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेमुळे मुलीची धाकटी तीन भावंडे जागी झाली. त्यांनी हा प्रकार पाहिला म्हणून केवळ त्यांची हत्या करण्यात आली.
सर्वांत थोरला भाऊ आईवडिलांबरोबर परगावी गेला होता आणि आपल्या चार भावंडांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यानं आपल्या मित्रांवर सोपविली होती. याच मित्रांनी घात करून हे कृत्य केल्याचा संशय असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तपासात संशयित काही दिशाभूल करणारी माहिती देत असले, तरी पोलिसांनी सांगितलेला घटनाक्रम पाहता मैत्रीपासून माणुसकीपर्यंत प्रत्येक उदात्त भावनेला या मंडळींनी हरताळ फासला, असंच चित्र दिसतंय. कुठून येतं इतकं क्रौर्य?
अत्याचाराची आणि क्रौर्याची एखादी मोठी घटना जेव्हा उघडकीला येते आणि हाहाकार उडतो, त्यानंतर काही दिवस महिलांच्या सुरक्षिततेविषयी चर्चा होते आणि यंत्रणाही सक्षम होतात. संबंधित घटनेचा तपशील माध्यमे सर्वत्र पोहोचवत असतात आणि त्यामुळे काही दिवस सर्वत्र सन्नाटा पसरतो, असा अनुभव आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरसच्या घटनेनंतर काही दिवस तरी असे प्रकार थांबतील असं वाटलं होतं. परंतु उत्तर प्रदेशातच झाशीमध्ये एका 17 वर्षांच्या मुलीवर कॉलेज कॅम्पसमध्ये अत्याचार झाल्याची घटना समोर आली. विशेष म्हणजे, घटना घडली तेव्हा कॉलेजात परीक्षा सुरू होती आणि त्यासाठी आवारात पोलीस बंदोबस्तही होता.
तिकडे तेलंगणच्या निजामाबादमध्ये 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करून लोकांनी एका ढोंगी बाबाला फोडून काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. मानसिक आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्यानं हा ढोंगी साधू मुलीवर अत्याचार करत होता असा स्थानिकांचा आरोप आहे. मुलीच्या पोटात दुखू लागलं आणि तपासणीत ती गर्भवती असल्याचे कळले तेव्हा हा प्रकार उघड झाला. एखाद्याने आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा केला, की लोक कसे भुलतात आणि आपल्या मुलीबाळींना त्यांच्या हवाली कसे करतात, याचे आश्चर्य वाटते.
ओडिशामध्ये तर 17 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून सलग 22 दिवस तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आईवडिलांशी भांडून घरातून निघून गेलेल्या मुलीला दोघांनी एका पोल्ट्री फार्मवर नेलं आणि खोलीत डांबून दररोज तिच्यावर अत्याचार करत राहिले. नवरात्रोत्सवात आपण आदिशक्तीची आराधना करीत असताना समोर आलेली ही प्रकरणं. अशा प्रकारचे गुन्हे वाढण्यामागील कारणांचा वेळीच शोध घेऊन उपाय योजले नाहीत, तर अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.