नवी दिल्ली – जर दोषी ठरवले जाईपर्यंत अटक केली जाणार नसेल, तर आपण भारतात परत यायला तयार आहोत, असे वादग्रस्त इस्लामी व्याख्याता झकीर नाईकने म्हटले आहे. आपल्याला अटक केली जाणार नसल्याची हमी सर्वोच्च न्यायालयाकडून मिळावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे.
भारतातून 2016 साली पळून गेल्यापासून झकीर नाईक सध्या मलेशियामध्ये रहात आहे. मलेशिया सरकारने त्याला कायम रहिवाशाचा दर्जा दिला आहे. एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये झकीर नाईकने भारतात परत येण्याची आपली तयारी असल्याचे सांगितले. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. भाजप सरकार सत्तेत येण्यापूर्वी सरकारविरोधात बोलता यायचे. किमान 80 टक्के वेळा तरी न्याय मिळायचा. आज ही शक्यता केवळ 10-20 टक्के इतकीच आहे. दहशतवादाच्या आरोपांखाली किमान 10 वर्षे शिक्षा झाली तर आपले संपूर्ण मिशन उद्ध्वस्त होईल, असे तो म्हणाला.
राष्ट्रीय तपास संस्था मलेशियातही आपली चौकशी करू शकते. दोषी ठरवले जाईपर्यंत अटक केली जाणार नाही, अशी हमी जर सर्वोच्च न्यायालयाकडून मिळणार असेल, तर आपण भारतात यायला तयार आहोत, असे तो म्हणाला.
बांगलादेशातील गुलशन होली आर्टिसन बेकरीमध्ये इस्लामिक स्टेटने 1 जुलै 2016 रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 20 जण ठार झाले होते. त्यात बहुतेक विदेशी पर्यटकांचा समावेश होता. बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान झाकीर नाईकचे नाव पुढे आले होते. त्याच्यावर धार्मिक तेढ पसरवणारी व्याख्याने दिल्याचा आरोप आहे.
आपण कोणालाही बॉम्बस्फोट घडवायला सांगितलेले नाही. जर कोणी आपल्या भाषणातून दहशतवादी कृत्याची प्रेरणा घेतल्याचे म्हणत असेल तर तो खोटे बोलत आहे, असे नाईक म्हणाला.
मनी लॉंडरिंगच्या आरोपांबाबतही झकीर नाईकने स्पष्टिकरण दिले आहे. आपल्याकडे केवळ एकच बॅंक खाते आहे. काही कंपन्या आणि काही उद्योगही आहेत. त्यांच्या कामासंदर्भात व्यवहार सुरू असतात, असे स्पष्टिकरणही त्याने दिले आहे.