देशात गेले काही महिने धुमाकूळ घालणारा करोना आता बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे. रोज हजारोंच्या संख्येने करोनाचे रूग्ण आढळून यायचे. मधल्या काळात तर रोजची संख्या 80 हजारांच्याही पुढे गेलेली दिसली, पण गेल्या काही दिवसांत हे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याची आनंदाची बातमी आहे. सोमवारचा संपूर्ण देशातील नव्या करोनाग्रस्तांचा आकडा 36 हजार 604 इतका होता. रूग्णांचा इतका कमी आकडा 101 दिवसांपूर्वी म्हणजे 17 जुलैला नोंदवला गेला होता. त्या दिवसाची नोंद 35 हजार 65 इतकी होती. करोनाची सर्वोच्च लागण झाल्याचा दिवस 17 सप्टेंबर होता आणि त्यानंतरच्या दिवसात मात्र तो दिवसेंदिवस लक्षणीयरीत्या घटताना दिसत आहे.
या बाबतीत महाराष्ट्राची स्थितीही समाधानकारकरीत्या सुधारली आहे, ही आपल्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे. गेले काही दिवस करोनाच्या बाबतीत देशात पहिल्या स्थानावर असलेला महाराष्ट्र आता तिसऱ्या स्थानावर गेला आहे. सोमवारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आढळून आलेल्या नवीन करोनाग्रस्तांची संख्या 3 हजार 645 इतकीच होती. हा गेल्या 124 दिवसातला नीचांकी आकडा होता. राज्यातील कोविडग्रस्तांच्या मृत्यूचेही प्रमाण कमी झाले असून सोमवारी बळींची संख्या 64 वर आली आहे. हाही 164 दिवसांतला नीचांकी आकडा म्हणून गणला गेला आहे. महाराष्ट्रात सरासरी रोज 72 हजारांच्या आसपास चाचण्या होत, ते प्रमाण आता 36 हजारांच्या आसपास आले आहे.
केरळ (4 हजार 287) आणि पश्चिम बंगाल (4 हजार 121) ही राज्ये आता महाराष्ट्राच्या पुढे आहेत. आपल्या राज्यात ही समाधानाची स्थिती निदर्शनाला येत असल्याने लोकांना जरा हायसे वाटू लागले आहे. अन्यथा या महामारीने लोकांना जीव नकोसा केला होता. जीवनाची सारी मजाच हरवल्यासारखी सगळ्यांची स्थिती झाली होती. पण आता लोक थोडा मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. रूग्णांचे हे कमी होणारे प्रमाण किती खरे किती फसवे याचीही आता चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी, सध्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रूग्णांची संख्या कमी दिसत असल्याची शंका व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी देशात रोज 10 लाख ते 14 लाख या दरम्यान चाचण्या होत होत्या.
आता हे प्रमाण दहा लाखांच्या आत आले आहे. 25 ऑक्टोबर रोजी सर्वात कमी म्हणजे 9 लाख 39 हजार 309 चाचण्या झाल्या आहेत. पण चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी ज्या प्रमाणात चाचण्या होत आहेत त्या प्रमाणात रूग्ण आढळून येत नसल्याने एकुणातच रूग्णांची संख्या घटत चालली आहे या दाव्याला पुष्टी मिळते आहे. एकीकडे हे होत असतानाच युरोपातील काही देशांमध्ये मात्र पुन्हा करोनाची दुसरी लाट निर्माण झाल्याच्या बातम्याही प्रसारीत झाल्या असून स्पेनमध्ये तर आणीबाणीच जाहीर करण्यात आली आहे.
अमेरिकेतही करोना रूग्णांचे प्रमाण वाढताना दिसू लागले आहे. ज्या देशातून या रोगाचा उद्भव झाला त्या चीनमध्येही पुन्हा मोठ्या प्रमाणात हे रूग्ण आढळून येऊ लागल्याने आता मात्र भारतालाही बऱ्यापैकी जागृत राहावे लागणार, असे दिसते आहे. करोनाची दुसरी मोठी लाट येईल अशी आशंका बऱ्याच तज्ज्ञांनी या आधीही बोलून दाखवली होती. त्यातच आता हिवाळा सुरू होत असल्याने करोना प्रादुर्भावही वाढणार असल्याचे सांगितले जात असल्याने रूग्ण घटत चालल्यामुळे निर्माण झालेले सुखद वातावरण पुन्हा झाकोळले जाणार नाही ना याचीही शंका सतावू लागली आहे. करोनाशी लढा देता देता साऱ्या सरकारी यंत्रणा थकून गेल्या आहेत.
वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्सही थकले आहेत. आता पुन्हा नव्या लाटेची कल्पनासुद्धा नकोशी वाटू लागली आहे. अर्थात, अशा आपत्तीच्या काळात आपल्याला नकोसे वाटणे किंवा हवेसे वाटणे याला काहीच अर्थ नसतो. अशा स्वरूपाच्या आपत्ती त्यांच्या धोक्यानुसार कमीजास्त प्रमाणात उद्भवतच राहतात, त्याला तोंड देण्यासाठीच्या वैद्यकीय आणि अन्य उपाययोजना सिद्ध ठेवाव्याच लागतात. त्यामुळे युरोपात जेव्हा करोनाची दुसरी लाट येऊ लागली असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या आहेत, त्या लक्षात घेऊन आपल्याला पूर्वीपेक्षाही अधिक सजगपणे याला सामोरे जाण्याची सिद्धता ठेवावी लागणार आहे.
या दुसऱ्या लाटेत पुन्हा लॉकडाऊन वगैरे सारखी परिस्थिती उद्भवणार आहे काय, याचा अजून अंदाज आलेला नाही. पण आता भारतात लॉकडाऊन करायचे नाही असा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारच्या पातळीवर झाला असल्याने ती भीती राहिलेली नसली तरी ही दुसरी लाट आपल्याला नेमक्या कोणत्या स्थितीकडे घेऊन जाईल याचा काही नेम नाही. सुदैवाने एव्हाना लोकांमध्ये करोनाच्या संबंधात पुरेशी जागृती निर्माण झालेली आहे.
काही बाबतीत सरकारने अत्यंत कडक भूमिका घेऊन मास्क न घालणाऱ्यांवर किंवा करोना निर्बंध न पाळणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई सुरू केल्याने त्याचेही अपेक्षित परिणाम दिसून येऊ लागले आहेत. करोना आटोक्यात आणायला हे निर्बंध बऱ्याच अंशी कारणीभूत ठरले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्वरित लस उपलब्ध होणे हाच खात्रीशीर उपाय असणार आहे. या लसीच्या बातम्यांकडेही लोक काळजीपुर्वक लक्ष ठेवून आहेत. जगात अनेक ठिकाणी या लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील मानवी चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचेही सांगितले गेले आहे.
काही देशांनी या लसीच्या वाटपाची यंत्रणाही सिद्ध ठेवली आहे. भारतात मात्र या बाबतीत काय सिद्धता झाली आहे हे अजून नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. लस यायच्या आतच त्याचे निवडणुकांच्या राजकारणासाठी भांडवल केले जाऊ लागल्याचे आपण बिहारसारख्या राज्यात पाहिले आहे. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही मोफत लस वितरीत करणार आहोत अशा घोषणाही करून टाकल्या आहेत.
ही लस सरसकट सर्वांना मोफत मिळणार की कसे या विषयीच्या एकसमान सरकारी धोरणाची घोषणा एव्हाना व्हायला हवी होती. देशातील सर्व 134 कोटी लोकांना ही लस देण्याचा उपद्व्याप सोपा नाही. लसीची उपलब्धता आणि त्याचे वितरण तसेच खर्चाची सिद्धता याचे नेमकेपणाने नियोजन होणे गरजेचे आहे. केंद्र सरकार या अनुषंगाने लवकरच आपले लस विषयक धोरण जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.