संगमनेर – संगमनेरकरांनी आम्ही संगमनेरकर’ या फलकाखाली बिगर राजकीय आंदोलन करून बुधवारी थेट हिवरगाव पावसा टोलनाक्यावर रस्ता रोको करून ठिय्या आंदोलन केले. अपुरी कामे, रस्त्याची चाळण, सुविधांची कमतरता तरीही सक्तीची वसुली असलेल्या हिवरगाव पावसा टोलनाका प्रशासनाविरोधात संगमनेरकरांनी केले हे मोठे आंदोलन होते.
यावेळी टोल प्रशासन संगमनेरकरांसमोर झुकले आणि स्थानिक नागरिकांना टोल माफी मिळाली असून फास्ट टॅगच्या माध्यमातून जर स्थानिकांचे पैसे कट झाल्यास टोल प्रशासनाशी संपर्क करून ती रक्कम पुन्हा दिली जाणार असल्याचे तसेच इतर काही मागण्या वरिष्ठपातळीवर निर्णय घेऊन महिनाभरात पूर्ण करणार असल्याचे टोल प्रशासनाने आश्वासन दिले.
गेली पाच वर्ष नूतनीकरणाचे काम चाललेला पुणे-नाशिक महामार्ग 2017 साली 70 टक्के पूर्णत्त्वाच्या नियमावर टोल वसुलीसह सुरु झाला. त्यानंतरच्या कालावधीत ठेकेदार असलेल्या मॉन्टो कार्लो कंपनीने संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या जवळपास 50 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावरील प्रलंबित असलेली कामे पूर्ण करणे क्रमप्राप्त होते.
मात्र टोल वसुलीसह हा महामार्ग सुरु होवून चार वर्षांहून अधिक लोटूनही ठेकेदाराने या कामांकडे दुर्लक्ष केले असून अनेक ठिकाणचे उपरस्ते चक्क गिळून टाकले आहेत. त्यामुळे महामार्गाच्या लगत असलेल्या वाड्या-वस्त्यांकडे जाण्यासाठी नागरिकांनी धोकादायकरित्या महामार्ग ओलांडण्याची वेळ आली आहे.
यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ, किशोर डोके, जनार्दन आहेर, अमर कतारी, अण्णासाहेब काळे, रमेश काळे, अविनाश थोरात, नारायण खुळे, नीलिमा घाडगे, सचिन साळवे, दीपक साळुंके, अक्षय थोरात, अजिंक्य उपासनी, हाफिज शेख, नानासाहेब पर्बत, शीतल हासे, सदाशिव हासे, विलास डमाळे, योगेश सूर्यवंशी, दत्तू नाईक, विजय आढाव, श्याम रहाणे, योगेश बिचकर, बुवाजी खेमनर, लखन घोरपडे आदिंनी आम्ही संगमनेरकर’ या फलकाखाली एकत्रित येत बुधवारी सकाळी 10 वाजता अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवत हिवरगाव पावसा टोलनाक्यावर धडक देत स्थानिकांना मोफत प्रवासाची सुविधा असताना सक्तीने टोल वसुली कशी केली जाते याचा जाब टोलनाका प्रशासनाला विचारला. यावेळी पुणे-नाशिक महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर ठेकेदार कंपनीने रस्त्याची अर्धवट राहिलेली सर्व कामे पूर्ण करावीत, संपूर्ण महामार्गाची दुरुस्ती करावी, बंद असलेले पथदिवे त्वरीत सुरु करावेत व अपूर्ण राहिलेल्या उपरस्त्यांची त्वरीत कामे पूर्ण करावी, अशा मागण्या केल्या. हे आंदोलन राजकारणविरहित नागरिकांसाठी करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून आंदोलनात संगमनेरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
=================