आमदार कोल्हेंचा परजणे व काळेंना सवाल
कोपरगाव – आमदार झाल्यानंतर कोपरगाव मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यातुन अनेक रस्त्यांची कामे गेल्या पाच वर्षात झाली. काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. परंतु काही रस्ते हे जिल्हा परिषद, पंचायत समितींतर्गत येतात. त्या रस्त्याची अवस्था दयनीय आहे. असे रस्ते आमदाराच्या नावावर खपवले जात आहेत. पण एका उमेदवराची आक्का जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तर एकाची सासुबाई उपाध्यक्ष आहेत. मग आक्का आणि सासुबाईकडुन कोपरगावतील जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची कामे का झाले नाहीत, असा सवाल करून आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे व अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांच्यावर निशाणा साधला.
पढेगाव येथे नागरीकांशी संवाद साधतांना कोल्हे बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, केशव भवर, उत्तम चरमळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हे म्हणाल्या,जिल्हा परिषद, पंचायत समितीत त्यांची सत्ता असुनही विकास करता आला नाही. जनतेच्या कामाची मनापासुन तळमळ लागते. केवळ सत्तेसाठी राजकारण करणाऱ्यांच्या भुलथापांना बळी पडू नका.
केंद्रात जे सरकार आहे.त्याच सरकारला निवडुण द्या. या निवडणुकीत बरेच हौसे, गौसे, नवसे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचीही एकदा हौस होऊ द्या, असे म्हणत विरोधकांचा समाचार आ. कोल्हे यांनी घेतला.प्रमोद लबडे, शिवाजी ठाकरे, केशव भवर यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारावरती निशाणा साधत युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याची आवाहन केले. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप महायुतीचा उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरांमधून महिलांची प्रचार रॅली काढण्यात आली. हजारो महिला या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होता. आ. कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी उघड्या जीपमधून प्रचार केला. मुख्य रस्त्यावर ही प्रचार रॅली निघाल्याने मतदारांची लक्ष वेधत होती. महिला भाजप महायुती उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या नावाचा जयजयकार करीत विविध गाण्यांमधून मतदारांची लक्ष वेधत होत्या.