राजगुरूनगर- राजगुरूनगर येथील हजरत दिलावर खॉं दर्ग्याच्या विकासासाठी भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडून 1 कोटी 46 लाख 78 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वंचित राहिलेल्या राजगुरूनगर येथील हजरत दिलावर खॉं दर्ग्याची मोठी पडझड झाली आहे. दर्ग्याच्या आत असलेल्या कबरींची वास्तूची पडझड झाली आहे. सुमारे 4 एकर क्षेत्रापेक्षा जास्त जागा असून राजगुरुनगर शहरातील मध्यावर हा ऐतिहासिक ठेवा आहे.
या घुमटाच्या दगडी भिंतीची पडझड झाली आहे. या दर्ग्यासाठी पुरातत्व विभागाकाडे मुस्लीम बांधवांनी अनेकदा पत्रव्यवहार करून निधी मिळण्याची मागणी केली होती. सातत्याने पाठपुरावा करूनहि निधी मिळत नसल्याने हिंदू- मुस्लीम बांधव नाराज होते. मध्यंतरीच्या काळात तालुक्याचे खासदार-आमदार यांनी एकत्र प्रयत्न करून पुरातत्व विभागाकडे सुशोभीकरणाचा प्रस्ताव पाठवला होता. त्यास भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने मंजुरी दिली असून 1 कोटी 46 लाख 78 हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र तालुक्याचे आमदारांना सोमवारी (दि. 1) भारत सरकार पुरातत्व विभागाने पाठवले आहे. हा निधी मिळाल्याने राजगुरुनगर शहरातील हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. भारतीय पुरातत्व विभाग मुंबई अधीक्षक बिपीन चंद्र यांनी आमदार सुरेश गोरे यांना माहितीसाठी याबाबतचे पत्र पाठवले आहे.