वालचंदनगर ंयेथील शेती महामंडळाच्या 34 एकरांमध्ये प्रयोग
वालचंदनगर- वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ गेल्या 11 वर्षांपूर्वी बंद करण्यात आले. या 14 मळ्यांतील 22 हजार एकर जमिनीवर वेड्या बाभळीने थैमान घातलेले होते. त्यातील काही जमिनी खंडकरी शेतकऱ्यांना परत केलेले आहेत. हजारो एकर जमिनी भाडेतत्वावर दिलेली आहेत. त्या जमिनीवर आज भरउन्हाळ्यात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असताना 34 एकरात सेंद्रिय पद्धतीने मिरची लागवड केली आहे. हा केवायपी कंपनीच्या माध्यमातून उच्च दर्जाची मिरचीचा यशस्वी प्रयोग राबविण्यात आला आहे. हा प्रयोग वालचंदनगर भागातील शेतकऱ्यांना आदर्शवादी ठरला असल्यामुळे शेतकरी पीक पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.
वालचंदनगर रत्नपूरी येथील शेतीमहामंडळाच्या भाडेतत्वावर दिलेल्या अंथुर्णे भागातील पोलीस ठाण्यालगत असलेल्या 34 एकरांत तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्वात मोठा मिरची लागवडीचा फड आहे. पाणीबचतीसाठी मल्चिंग पेपर व अंडरग्राउंड ड्रीप उपलब्ध करून दिले आहे. 34 एकरांमध्ये कंपनीच्या निरीक्षणावर आधारित सेंद्रिय जैविक खतांचा भरपूर वापर केला आहे. रासायनिक खत वापरले नाही. ड्रीपच्या सहाय्याने दररोज ओलावा निर्माण करण्यात आलेला आहे. सध्या 42 डिग्री सेल्सिअस तापमान असताना 34 एकरांमधील मिरची हिरवीगार टवटवीत दिसत आहे. स्थानिक बाजाराऐवजी परराष्ट्रीय बाजारात सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीला महत्त्व प्राप्त होत असल्यामुळे या शेतीमहामंडळाच्या भाडेतत्त्वावर दिलेल्या 34 एकरांमधील मिरचीला केवायपी कंपनीच्या माध्यमातून परदेशात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.