दुष्काळामुळे उत्पन्न घटले; भाव मात्र समाधानकारक
माळेगाव- दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा चिंचेला अपेक्षित फळधारणा झालेली नाही, त्यामुळे उत्पन्न घटले आहे. बांधावरील, कोपऱ्या-सोपऱ्यात असलेल्या चिंचांच्या झाडातून शेतकऱ्यांना थोड्याफार उत्पन्नातून आधार मिळतो. परंतु, यंदा चिंचेचे उत्पादनही दुष्काळामुळे कमी झाले आहे. सध्या, चिंचा काढण्याचा हंगाम सुरू असून गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. फेब्रुवारी ते एप्रिल हा कालावधी चिंचेचा हंगाम मानला जातो. यावर्षी म्हणावा असा पाऊस झाला नसल्याने चिंचेच्या झाडांना फळधारणा कमी प्रमाणात झाली आहे. यातून उत्पादन कमी झाल्याने भाव मात्र समाधानकारक मिळत आहे.
चिंचेचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत निम्याने निघत असल्याने मोठा फटका बसत असल्याचे शेतकरी सांगतात. बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचे चिंचचे उत्पादन जुन्याच झाडावर अवलंबून असते. नवीन चिंचेची झाडे लावली असली तरी त्या झाडांना फळधारणा होण्यासाठी 10 ते 15 वर्षांचा कालावधी आवश्यक असतो. यामुळे शेतकरी उत्पादन घेण्यास तयार होत नाहीत. मात्र, जुन्या चिंचेच्या झाडाची तोड होत असल्याने तसेच चिंचेच्या झाडास फळ लागण्यासाठी चिंच झोडणाऱ्यांचे काम करावे लागते. परंतु, त्याचे प्रमाणही कमी झाले आहे. पूर्वी शेतकरी झाडे झोडत असतं, पण आता या कामात मोठ्या प्रमाणात उदासिनता दिसून येत आहे. यंदा चिंचांचा मोहर गळून गेल्याने चिंच उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.
- एका झाडापासून दोन पोतीच माल…
चिंचेला यंदा बाजारात सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. गेल्यावर्षी ज्या झाडांना नऊ ते दहा पोती चिंच निघत होती. त्या झाडाला यंदा दोन ते तीन पोती माल निघत आहे. निम्यापेक्षा कमी झालेला माल काढण्यासाठी मजुरांना दिवसाची हजरी देणे व चिंच फोडणे यासाठी पैसे द्यावे लागत असल्याने मोठा तोटा होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.