घरांसह दुकाने आणि वाहनांना देखील भगव्या झेंड्याची गुढी
शिक्रापूर -शिक्रापूर व परिसरामध्ये हिंदूनव वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील वैशिष्ट्य म्हणजे येथील काही युवकांनी केलेल्या जनजागृतीमुळे कित्येक ठिकाणी गुढीसाठी साडीऐवजी भगवा झेंडा
उभारून हा सण साजरा करण्यात आला.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील अतुल थोरवे व विक्रम धुमाळ, विशाल रुके यांनी गुढीपाडव्याचे खरे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतः एक लघुचित्रपट तयार केला असून, त्या लघुचित्रपटाच्या माध्यमातून गुढीपाडव्याचा इतिहास सांगत प्रभूरामचंद्र वनवासाला गेले आणि ज्या दिवशी ते परत आले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्धप्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. अयोध्यातील आणि भारतवासीयांनी या दिवसापासून गुढी उभारण्यास सुरवात केली; परंतु संभाजी राजे संगमेश्वरला होते त्यावेळी औरंगजेबाने त्यांना पकडले; परंतु लगेच मारले नाही तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मारले. कारण हिंदूंना गुढीपाडवा साजरा करता येऊ नये. त्यांनतर ज्या लोकांना हे समजले त्यांनी गुढी उभारली नाही तर ज्यांना माहीत नव्हते त्यांनी गुढी उभारली; परंतु त्यांनतर औरंगजेबाने मोघलांना पाठवून घरावर आक्रमण करून गुढ्या फाडल्या आणि त्यावर साड्या टांगल्या व तेव्हापासून साडीपाडवा सुरू झाला आहे. पूर्वीचे लोक गेले; परंतु आजपर्यंत तीच पद्धत सुरू असल्याचे सांगितले असून, खरा इतिहास समोर आणून गुढीचे महत्त्व या युवकांनी पटवून दिले आहे.
अतुल थोरवे, विक्रम धुमाळ, विशाल रुके व रोहित थोरात या युवकांनी केलेल्या या लघुचित्रपटामुळे शिक्रापूरसह अनेक गावांमध्ये जनजागृती झाली असून, कित्येक ठिकाणी या पद्धतीनेच भगवा झेंडा, त्याला हार व साखरगाठी बांधून गुढी उभारण्यात आली आहे. कित्येकांनी दुकानांना आणि वाहनांना देखील भगवी गुढी बांधली होती, सध्या या परिसरामध्ये अशा पद्धतीच्या गुढीचे महत्त्व वाढू लागले असून, अनेकांची इच्छा असताना देखील फक्त भगवा झेंडा मिळाला नसल्याने त्यांनी गुढीवर साडी न बांधता भगवे कापड बांधने पसंत केले असून त्यामुळे परिसरात ही गुढी देखील चर्चेचा विषय बनला आहे.
- जनजागृतीमुळे बदल झाला याचा आनंद
शिक्रापूरसह परिसरात काही युवकांनी एका लघुचित्रपटाच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीमुळे अनेकांनी साडीच्या गुढ्या न उभारता भगव्या गुढ्या उभारल्या. प्रतिवर्षी यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे याबाबत बोलताना आम्ही लघुचित्रपटाच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीमुळे समाजात काही बदल झाला याचा आनंद वाटत आहे.
– अतुल थोरवे, विक्रम धुमाळ, विशाल रुके व रोहित थोरात