नगर -दिवसेंदिवस पर्यावरणात होत असलेल्या बदलामुळे मनुष्याच्या आरोग्यवरही परिणाम होत आहे. यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची खरी गरज आहे.
प्रत्येकाने एक झाड लावून आपले कर्तव्य बजावावे. वृक्षारोपण व संवर्धन ही लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप मध्य मंडलाध्यक्ष अजय चितळे व नगरसेविका सोनाली चितळे यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उपमहापौर मालनताई ढोणे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, मनोज ताठे, अजय ढोणे, चितळे आदी उपस्थित होते.
यावेळी गंधे म्हणाले की, वृक्षारोपण ही योजना अंमलात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता यासाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. वृक्षारोपण ही योजना फोटोपूर्तीच मर्यादित न राहता, त्याचे संवर्धन करुन पर्यावरणाचा समतोल राखावा असे म्हणाले. मध्यमंडल भागामध्ये 70 झाडे लावण्यात आले. तसेच प्रभागामध्ये प्रत्येक नागरिकाला दत्तक झाड योजना राबविणार आहोत, असे अजय चितळे म्हणाले.