नीरा नदीपात्रात पंधरा हजार क्युसेक विसर्ग
परिंचे- सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यास वरदान असणारे वीर धरण (ता. पुरंदर) सुमारे 98 टक्के भरले आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 29) दुपारी 4 वाजता धरणाच्या तीन दरवाजे 4 फुटाने उचलून 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये करण्यात आला, अशी माहिती वीर धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली. दरम्यान, पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वीर, भाटघर, नीरादेवघर, गुंजवणी या नीरा खोऱ्यातील या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सोमवारी पाच वाजेपर्यत वीर धरणात सुमारे 98 टक्के पाणीसाठा झाला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकुण 251 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर भाटघर धरण 65.45 टक्के भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकुण 555 मि.मी. पाऊस झाला आहे. तसेच नीरादेवघर धरण 67.18 टक्के तर गुंजवणी धरण 77.58 टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकुण 1545 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नीरा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने वीर धरणातून सोमवारी 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये तर नीरा उजव्या कालव्यातून 1500 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तसेच नीरा डावा कालव्याद्वारे 600 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. नीरा नदीला पूर आल्यामुळे वीर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.