लोकसभेचा निकाल असल्याने ग्राहकांची मागणी
आळंदी- लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. 23) सकाळपासून जाहीर होण्यास सुरुवात होणार असून या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले असल्याने गुरुवारी सकाळपासूनच घरोघरी टीव्ही सुरू होणार आहे. दरम्यान, गुरुवार म्हणजे महावितरणचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा दिवस आहे. त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल असल्याने महावितरणने गुरुवारी वीजपुरवठा खंडीत करू नये अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
पुणे जिल्ह्यात महावितरणच्या विविध कामांसाठी गुरुवारचा दिवस राखीव असून या दिवशी कोठे ना कोठे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीची कामे सुरू असतात, त्यामुळे या दिवशी त्या परिसरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात येतो. तसेच ज्या परिसरात महावितरणाकडून काम असते त्या परिसरातील ग्राहकांनी जो मोबाईल नंबर महावितरणाकडे नोंदवलेला आहे, त्या नंबरवर वीजपुवठा किती काळासाठी खंडीत केला जाणार आहे याबाबत एक दिवस आगोदर माहिती देण्यात आलेली असते, त्यामुळे ग्राहक जागृक राहतो व आपली कामे त्यापद्धतीने करीत असतो. मात्र, या गुरुवारी लोकशाहीच्या मोठ्या सोहळ्याचे भवितव्य जाहीर होणार असल्याने सगळ्यांच्या नजरा टीव्हीकडे वळणार आहे. त्यामुळे ज्या परिसरात महावितरणाला दुरुस्ती करायची आहे ती शुक्रवारी करावी व या गुरुवारी कोठेही वीजपुरवठा खंडीत करू नये, असे आवाहन ग्राहकांनी महावितरणला केले आहे.