नारायणगाव येथील जाहीर सभेत खासदार आढळराव यांचा पलटवार
नारायणगाव – शिरूर लोकसभा मतदारसंघ मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला आहे. पाच वर्षांत 14 हजार कोटींची कामे केल्यावरही विरोधक मला निष्क्रीय ठरवतात, तेही माझ्या खासदार निधीतून बांधलेल्या सभागृहात बसून. त्यांना उघडा डोळे, बघा नीट असे सांगावसे वाटते. दहा वर्षे मी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारकडे विकासकामांसाठी निधी मागितला;परंतु त्यांनी एक दमडाही निधी दिला नाही. ज्यांना 15 वर्षांच्या सत्ताकाळात विकास करता आला नाही ते मला तुम्ही काय केले असे विचारतात. पण त्यांना अजिबात असा अधिकार नाही, असा पलवाट खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.
शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी आपल्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 18) जुन्नर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात नारायणगाव येथे झालेल्या जाहिरसभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव घोलप, संतोष खैरे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, नारायणगावचे सरपंच बाबुभाऊ पाटे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, देवराम लांडे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष गौतम लोखंडे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा क्रांती सोमवंशी, भाजपचे उपाध्यक्ष उल्हास नवले, सूर्यकांत ढोले, सुनंदा गाडगे, पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, रमेश कुडे आदी उपस्थित होते.
खासदार आढळराव म्हणाले की, भाषणाला उभे राहताच जमलेल्या जनसमुदायाने आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली तोच धागा पकडून ते पुढे म्हणाले की,नारायणगावात शिवसेनेचाच आवाज असतो. आज मी दिवसभर जुन्नर तालुक्याचा दौरा केला. अतिशय चांगले वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी मला विजयासाठी आशिर्वाद देत दादा, विजय तुमचाच अशा शुभेच्छा दिल्या. नारायणगावात रॅलीला बाजारपेठेच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत झालेली गर्दी पाहिल्यावर अशाप्रकारचे वातावरण होऊ शकते असे वाटले नव्हते. जनता माझ्या पाठीशी उभी आहे, असे त्यांनी नमूद केले.
- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजय निश्चित आहे. कारण बिथरलेले विरोधक प्रचारात खालच्या पातळीवर जायला लागले आहेत. याचाच अर्थ त्यांना आपला पराभव स्पष्टपणे दिसू लागला आहे.
– शरद सोनवणे, आमदार, जुन्नर तालुका