शिरसटवाडी येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आवाहन
लासुर्णे- लोकसभेला आम्ही प्रामाणिकपणे आघाडीचा धर्म पाळला, त्यामुळे येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेला आघाडीचा धर्म पाळून आमचे काम करावे, असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
शिरसटवाडी (ता. इंदापूर) येथे गावभेट कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील वरील धरणांतून इंदापूरला येणाऱ्या पाण्यात कपात झाल्याने आगामी काळात तालुक्याला उन्हाळी आवर्तन मिळणार नाही. त्यामुळे आता आपल्याला संघर्ष करावा लागणार असून प्रसंगी जनआंदोलन उभारावे लागेल. गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात सणसर कट मधून थेंबभरही पाणी आलेले नाही. खडकवासलाचे हक्काचे पाणी मिळाले नाही, त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊन तालुक्याच्या इतिहासात प्रथमच जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्या लागल्या. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांना गटतट विसरून एकत्रित येण्याची गरज आहे, असेही माजी मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी नीरा भीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव, सरपंच जयकुमार रावण, उपसरपंच चंद्रशेखर शिरसट, माजी सरपंच फिरोज पठाण यांची भाषणे झाली. कार्यक्रमास मोहन दुधाळ, देवराज जाधव, अंबादास शिंगाडे, राहुल जाधव, भागवत भुजबळ, किशोर पवार, हनुमंत कदम, अनिल कदम, भागवत शिंगाडे, अंकुश हगवणे, बलभीम भुजबळ आदी उपस्थित होते.