माजी उपसरपंच संदीप सातव यांची माहिती : कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी
वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथे लातूर मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाप्रमाणेच प्रकल्प लवकरच उभारणार असल्याची माहिती माजी उपसरपंच संदीप सातव, उपसरपंच मारुती गाडे यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या पदाधिकारीवर्गाने लातूर येथे मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची दि 3 रोजी पाहणी केली. वाघोली गावाची लोकसंख्या जवळपास 2 लाखांच्या आसपास पोहचली आहे. त्यामुळे कचऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाघोलीमध्ये सध्या एक कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला आहे. तो तातडीने सुरू करण्यासाठी जवळपास 1 वर्षाचा कालावधी गेला आहे. आता वाघोलीची कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत त्वरित पाऊले उचलू लागली आहे.
उपसरपंच मारुती गाडे, माजी उपसरपंच संदीप सातव, ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते यांनी लातूर शहरात मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कचऱ्याची पाहणी केली. यावेळी जवळपास 150 टन कचऱ्याचे विघटन करण्याची क्षमता असणारा हा कचरा प्रक्रिया प्रकल्प असून ओला व सुका कचरा वर्गीकरण करून त्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर या कचऱ्यातून खत व इतर घटकांची निर्मिती होत आहे. वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने कचऱ्याची समस्या लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सातव यांनी सांगितले.
- कचऱ्याचा वास येत नाही
लातूर मनपाच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचरा प्रक्रिया करताना आजु बाजूला कचऱ्याचा वास येत नसून त्यासाठी योग्य त्या वेळी कचऱ्याच्या साठवणुकीसाठी त्यांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. लातूर मनपा व जनाधार संस्थेच्या वतीने नागरिकांना प्रबोधन केल्याने प्रत्येक घरातून ओला व सुका कचरा वेगळा करून त्याचे संकलन करण्यात येत आहे त्यामुळे घरापासून कचरा वर्गीकरणाची सवय नागरीकांना लागली आहे. दररोज 15 0 टन कचरा वर्गीकरण करण्याची क्षमता असणारा हा कचरा प्रक्रिया प्रकल्प असून या प्रकल्पास 8 वर्षे पूर्ण झाले आहेत मनपाच्या वतीने या कामी प्रत्येक टनाचे चे वर्गीकरण व प्रक्रिया कामी 900 रुपये तर घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा वर्गीकरण करून संकलनासाठी जनाधार संस्थेला 90 रुपये दर महिन्याला वतीने देण्यात येत आहेत. - वाघोलीमध्ये दररोज 45 ते 50 टन कचरा संकलन करण्यात येत आहे. यापैकी वाघोली ग्रामपंचायतीच्या सध्या सुरू असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची 15 टन वर्गीकरण क्षमता आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सन 2019-2020 या वार्षिक आराखड्यात कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी 2 कोटी रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. वाघोलीमधील कचऱ्याची समस्या लवकरच सोडवणार आहोत.
– संदीप सातव, माजी उपसरपंच, वाघोली. - वाघोली ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून कचऱ्याची समस्या लवकरच सोडवणार आहे. लातूर येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प आदर्शवत आहे
– मारुती गाडे, उपसरपंच, वाघोली.