लोणी काळभोर- कदमवाकवस्ती, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल, या शाळेत जलसाक्षरता व जलसंवर्धन विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना थेंबे थेंबे तळे साचे व भुजलाची गाथा हे माहितीपट दाखविण्यात आले. तर, पुणे जलसाक्षरता केंद्र, यशदा पुुणेचे जलमित्र प्रवीण मोरे यांनी पाण्याचे महत्त्व विषद केले.
या वेळी विद्यार्थ्यांना जलसाक्षरतेचे महत्व समजून सांगताना मोरे बोलत होते. यावेळी मुख्याधापिका मीनल बंडगर, ज्योती भोसले, रेहाना पठाण, अंजली सागर, पूजा काळे आदी उपस्थित होते.
मोरे म्हणाले की, प्रत्येकाने पाणी जपून वापरले पाहिजे. पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. जगातील कमी होत चाललेले पाणी हा पूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. प्रत्येकाला पाणी वापरण्याचा हक्क असला तरी प्रत्येकाने पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करणे हेही एक मूलभूत कर्तव्य आहे. पाण्यासाठी आजच प्रत्येकाने सजग आणि जागृत राहिले पाहिजे. अन्यथा पाण्यामुळे तंटे निर्माण होऊन मोठा रक्तपात होऊ शकतो. पाणी वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे. त्यासाठी चळवळ उभी करणे गरजेचे आहे. या चळवळीमध्ये विद्यार्थ्यांनी भावी भारताचा जबाबदार नागरिक म्हणून हिरिरीने सहभागी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.