रेडा- रेडणी (ता. इंदापूर) परिसरात सध्या दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. या वर्षी पहिल्यांदाच पडलेल्या भीषण दुष्काळामुळे गावातील पाझर तलाव कोरडा पडल्यामुळे परिसरातील विहीरी व कुपनलिका कोरड्या पडल्याने दरवर्षी हिरवेगार दिसणारे ऊस पीक पाण्याअभावी जळू लागले आहे. यामुळे आगामी काळात उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने साखर उद्योगालाही याचा फटका बसणार असून शेतकरीही अडचणीत येणार आहे. एकरी 60 ते 70 टन निघणारे उत्पन्न अवघ्या 30 ते 40 टनावर येणार असल्याने उत्पन्नात मोठी घट होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
इंदापूर तालुक्यातील वडापुरी, काटी, रेडा, रेडणी, पंधारवाडी, अवसरी, भोडणी, चाकाटी, बेडशींग, बाभूळगाव, शेटफळ हवेली परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विहिरीच्या व कुपनलिकेच्या पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाण्याअभावी शेती करणे अवघड झाले आहे. दरवर्षी हजारो एकर हिरवेगार दिसणारे क्षेत्र यावर्षी ओसाड दिसू लागल्याने दुष्काळाचा फटका शेती व्यवसायाला बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. एप्रिल महिन्यातच वाढलेल्या भीषण दुष्काळामुळे परिसरातील तलाव, विहिरी व कुपनलिकांचे पाणी कमी झाल्यामुळे पाण्याअभावी शेती व्यावसायच अडचणीत आला आहे.