रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड आणि यंत्रणेचा बेफिकीरपणा चर्चेत आला नाही, असा एकही दिवस जात नाही. सरकारी आरोग्य यंत्रणेतील ही बेफिकीर वृत्ती दूर करण्याचा प्रयत्न एकाही राज्य सरकारने केलेला नाही. सरकारी रुग्णालयांचा कारभार रामभरोसे सुरू असल्यामुळे खासगी रुग्णालये या परिस्थितीचा फायदा घेऊन भरपूर कमाई करतात.
ठाण्यातील काही रुग्णालयांना नियमांचे पालन न केल्याप्रकरणी टाळे ठोकण्यात आले. या रुग्णालयांना आधीच सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही नियमांचे पालन करण्यात हयगय केल्यामुळे हे पाऊल उचलावे लागले. सरकारी रुग्णालयांमध्ये उपकरणे अद्ययावत नसणे, त्यांची देखभाल योग्य प्रकारे न होणे आणि रुग्णांबाबत संवेदनशील व्यवहार न करण्याच्या तक्रारी सातत्याने होत असतात. अनेकदा उपकरणांची देखभाल योग्य रीतीने न केल्यामुळे उपकरणे पेट घेतात आणि रुग्णाला जीव गमवावा लागतो. रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी नियम आणि कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र, त्यांचे पालन होत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. रुग्णालयांची वारंवार तपासणी करून जेथे नियमांचे पालन केले जात नाही, अशा रुग्णालयांवर कठोर कारवाई करणे, हाच यावरील योग्य उपाय ठरू शकतो. अन्यथा, बेफिकिरीचे बळी अशाच प्रकारे जात राहतील. हा रामभरोसे कारभार रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी राहायलाच हवी. कायदे आणि नियम आपल्या जागी असतात. मात्र, त्यांचे पालन होते की नाही, नियमांची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहणारी यंत्रणा नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे.
देशाच्या अनेक भागांमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. काही रुग्णालयांमध्ये तर नवजात अर्भकांना ज्या विद्युतसंचालित काचेच्या पेटीत ठेवले जाते, तेथील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
– सूर्यकांत पाठक, अ.भा. ग्राहक पंचायत