राफेल निकालावर दिलेल्या प्रतिक्रीयेला आक्षेप
नवी दिल्ली – राफेल विमान घोटाळ्याच्या प्रकरणात सुप्रिम कोर्टाने अलिकडेच जो निर्णय दिला आहे त्यावर प्रतिक्रीया देताना राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले आहे त्याला भाजपने आक्षेप घेतला असून या प्रकरणी त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवरील सुनावणी येत्या 15 तारखेला होणार आहे. भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी यांनी ही अवमान याचिका दाखल केली आहे.
अब तो कोर्टनेही कहा है की चौकीदार चोर है अशी प्रतिक्रीया राहुल गांधी यांनी दिली होती. त्यांची ही व्यक्तीगत कॉमेंट असून ती त्यांनी न्यायालयाच्या तोंडी घालून न्यायालयाचा अवमान केला आहे असे मिनाक्षी लेखी यांनी म्हटले आहे. त्यांच्यावतीने ऍडव्होकेट मुकुल रोहतगी हे केस लढवत असून त्यांनी आज कोर्टात ही अवमान याचिका दाखल करताना हाच दावा केला. राफेल प्रकरणात कोर्टापुढे आलेले पुरावे दाखल करून घेत राफेल निकालाचा फेरविचार करावा ही याचिका सुनावणीस घेण्याचा निर्णय कोर्टाने नुकताच दिला आहे. त्या निर्णयाच्या दिवशी अमेठीत पत्रकारांशी बोलताना राहूल गांधी यांनी वरील प्रतिक्रीया दिली होती. या निर्णयाद्वारे राफेल खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचेच सुप्रिम कोर्टाने मान्य केले आहे असे राहुूल गांधी यांनी म्हटले होते. पण प्रत्यक्षात कोर्टाने आपल्या निकालपत्रात तसे काहीही म्हटलेले नाही असा मिनाक्षी लेखी यांचा आक्षेप आहे.