नितीन गडकरी यांचे भाकीत, आघाडी संधीसाधू असल्याची टीका
रांची : महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून बनवत असलेले सरकार संधीसाधू आहे. ते सहा आठ महिन्यात कोसळेल, असे भाकीत केंद्रीय मंत्री नितीन गडलरी यांनी वर्तवले.
निवडणूक प्रचारासाठी आलेले गडकरी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. ते म्हणाले, भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येणे हे दुर्देवी आहे. त्यांची ही आघाडी संधीसाधू आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते एकत्र आले आहेत. ते सत्ता स्थापन करतील की नाही याबाबत मी साशंक आहे. मात्र त्यांनी सत्ता स्थापन केली तरी ते सरकार सहा ते आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ चालणार नाही.
जर ही आघाडी फुटली तर भाजपा सरकार स्थापन करण्याचा दावा करेल काय? असे विचारता ते म्हणाले, अशा स्थितीत पक्ष योग्य तो निर्णय घेईल. क्रिकेट आणि राजकारणात काही घडू शकते, या वक्तव्याचा पुनरूच्चार करीत ते म्हणाले, तीन टोकाच्या विचारधारा असणारे पक्ष सत्तेसाठी एकत्र येतात, हे त्याचेच द्योतक आहे.
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती हिंदुत्वावर आधारीत होती. शिवसेनेने मुख्यमंत्रीपद वाटपाचा केलेला दावा खोटा होता. ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री हे सुत्र ठरले होते. त्यानंतर पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यानी मान्य केल्याचे खोटे पुढे आणले. त्यामुळे परिस्थितीने दुर्देवी वळण घेतले, असे ते म्हणाले. शरद पवार आणि पंतप्रदान नरेंद्र मादी यांच्यात काय चर्चा झाली याबाबत आपणास कल्पना नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.