नाशिकमध्ये भाजप-मनसे एकत्र, तर उल्हासनगरमध्ये भाजपला धक्का
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापने तिढा अद्याप सुटलेला नाही. त्याच वेळी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक यासारख्या महापालिकांच्या महापौरपदांची निवडणूक पार पडलेली आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप सत्तास्थापनेपासून दूर दिसत आहे. परंतु मुंबई वगळता बहुतांश महापौरपदांवर भाजपचे उमेदवार विराजमान झाले आहेत.
मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांची भाजपने माघार घेतल्याने बिनविरोध निवड झाली आहे.
उपमहापौरपदी सेनेच्याच सुहास वाडकर यांची निवड झाली आहे. विरोधकांना परखड उत्तर देणाऱ्या नेत्या अशी किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे.
महापौरांवर एक नजर
मुंबई – किशोरी पेडणेकर (शिवसेना), उपमहापौर सुहास वाडकर (शिवसेना)
नाशिक – सतीश कुलकर्णी (भाजप), उपमहापौर भिकू बाई बागुल (भाजप)
उल्हासनगर – लीलाबाई आशन (शिवसेना)
नागपूर – संदीप जोशी (भाजप), उपमहापौर मनिषा कोठे (भाजप)
चंद्रपूर – राखी कंचर्लावार (भाजप), उपमहापौर राहुल पावडे (भाजप)
अमरावती – चेतन गावंडे (भाजप), उपमहापौर कुसुम साहू (भाजप)
अकोला – अर्चना मसने (भाजप), उपमहापौर राजेंद्र गिरी (भाजप)
लातूर – विक्रांत गोजमगुंडे (कॉंग्रेस), उपमहापौर चंद्रकांत बिराजदार
परभणी -अनिता सोनकांबळे (कॉंग्रेस), उपमहापौर भगवान वाघमारे (कॉंग्रेस)
दुसरीकडे उल्हासनगर महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. कारण महाआघाडीच्या बळावर शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशन महापौर झाल्या. आशान यांना टीम ओमी कलानी आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला.
नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत अनोखे ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळाले. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी पुन्हा पक्षाला संकटातून तारत महापौरपद राखण्यास मदत केली. त्यामुळे नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी बिनविरोध निवडून आले आहेत. नाशिकमध्ये मात्र महाआघाडीत फूट पडल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेला मतदान करण्याचा व्हीप बजावूनही कॉंग्रेसचे नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सतीश कुलकर्णी हे नाशिकचे 16 वे महापौर ठरले आहेत.
नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या संदीप जोशी यांची निवड झाली आहे. भाजपच्या संदीप जोशी यांना 104 मते, तर कॉंग्रेसच्या हर्षदा साबळे यांना 26 मते मिळाली. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर भाजपच्या मनिषा कोठे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. कोठे यांना 104 मते मिळाली, तर दिनेश्वर पेठे (राष्ट्रवादी) यांना 26 मतं आणि मंगला लांजेवार (बसप) यांना 10 मते मिळाली.
चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांची निवड झाली. कंचर्लावार यांना 42 मते, तर कॉंग्रेस उमेदवार कल्पना लहामगे यांना 22 मते मिळाली. 2 नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. तर उपमहापौरपदी भाजपच्या राहुल पावडे यांचा विजय झाला. पावडे यांना 42 तर कॉंग्रेसच्या अशोक नागापुरे यांना 22 मते मिळाली. भाजपने आपला सत्तागट कायम राखण्यात यश मिळवले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची निकराची लढाई सफल झाल्याचे दिसते.
अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे चेतन गावंडे तर उपमहापौरपदी भाजपच्या कुसुम साहू यांची निवड झाली. महापौरपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या प्रदीप हिवसे यांचा पराभव झाला. अकोला महापालिकेत पुन्हा भाजपच्या महापौराची सत्ता आली आहे. अकोल्याच्या महापौरपदी भाजपच्या अर्चना मसने, तर उपमहापौरपदी भाजपचे राजेंद्र गिरी विजयी झाले आहेत.
लातूरचे महापौरपद आता भाजपकडून कॉंग्रेसकडे गेले आहे. कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे लातूरचे नवीन महापौर झाले आहेत. भाजपच्या दोन नगरसेवकांनी कॉंग्रेसला मतदान केले. भाजप 35, तर कॉंग्रेस 34 असे पक्षीय बलाबल आहे. कॉंग्रेसचा एक नगरसेवक अनुपस्थित राहिला, तर भाजपच्या एका नगरसेवकाच्या मृत्यूमुळे जागा रिकामी होती. भाजपचे दोन नगरसेवक फोडून कॉंग्रेसने पालिकेवर ताबा मिळवला.