कामशेत – मावळ तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीच्या काळात पडलेल्या पावसावर ज्या शेतकऱ्यांनी लागवडी केल्या.त्या लागवडी आता पाण्याअभावी सुकू लागल्याने “येरे येरे पावसा…’ अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मावळात मागील आठवड्या भरापासून पावसाने उघडीप दिल्याने पाण्याअभावी भात लागवडी खोळंबल्या आहेत, तर झालेल्या लागवडी पाण्याअभावी सुकू लागल्या आहेत. या वर्षी मावळात उशिरा म्हणजेच 10 जुलैला मॉन्सूनचे आगमन झाले. आगमन झाल्यापासून पुढील 10 दिवस देखील नियमितपणे पाऊस न पडल्याने दरवर्षी पाण्यानी तुडूंब भरून वाहणारी भात खाचरे आता कोरडी पडली आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांना भात लागवड करता येत नसल्याने भात लागवडी देखील खोळंबल्या आहेत. तालुक्यात दरवर्षी सरासरी बाराशे ते चार हजार मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या भागातील शेतकरी भाताचे पीक घेतात.
उद्यापासून पुन्हा बरसणार
घाटमाथा वगळता राज्यात सर्वत्र पावसाने विश्रांती घेतली असली, तरी येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्याची लक्षणे दिसू लागल्याने गुरुवारपासून राज्यात सर्वत्र पावसाचे आगमन होईल. दरम्यान, सध्या फक्त घाट माथ्यावर पावसाचा जोर आहे. त्याचबरोबर कोकणातही एक ते दोन सरी दिवसभरात कोसळत आहेत. त्याव्यतिरिक्त राज्यात सर्वत्र पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात सर्वत्र पावसाला सुरूवात झाली होती. हा पाऊस आठवडाभर तरी राहील, अशी शक्यता होती पण दोन दिवसांनंतर पुन्हा उघडीप घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.