– उप विभागीय पोलीस आधिकारी दीपाली खन्ना
नारायणगाव- तरुणींनो ,शालेय मुलींनो घाबरू नका तुमच्या संरक्षणासाठी पोलीस 24 तास सतर्क आहेत . तरुणींनी छेडछाड,अन्य त्रास देणाऱ्या तरुणांना न घाबरता पुढे येऊन अशा गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी थेट पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन उप विभागीय पोलीस आधिकारी दीपाली खन्ना यांनी नारायणगाव येथे केले आहे .
वारूळवाडी येथील गुरुवर्य रा.प. सबनिस विद्या मंदिरात निर्भया पथकाच्या वतीने उप विभागीय पोलीस आधिकारी दिपाली खन्ना व डॉ.अनुष्का शिंदे यांनी हितगुज उमलत्या कळ्यांशी व ‘चला महत्वाचं बोलू थोडं…!’ या उपक्रमांतर्गत काल 1 ऑगस्ट सकाळी 11. 30 वा मार्गदर्शन शिबीर आयोजीत करून शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींशी संवाद साधला.यावेळी ग्रामोन्नत्ती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे ,कार्याध्यक्ष अनिल मेहेर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील , रवींद्र पारगावकर ,रमेश जुन्नरकर, मुख्याध्यपक रवींद्र वाघोले, सर्व शिक्षक व 1200 विदयार्थी उपस्थित होते.
यावेळी दिपाली खन्ना ,डॉ.अनुष्का शिंदे, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी मुलींनी स्वतः पुढे येऊन होणारे त्रास, किंवा कोणी छेडछाड करत असेल त्याची माहीती द्यावी,विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी पोलीस 24 तास उपलब्ध आहेत. आपल्या तक्रारी पोलिसांना , शिक्षकांना, किंवा निर्भया पथकातील सदस्यांना कळवा , तसेच मुलांमुलीनी विचारलेल्या प्रश्नांचे खन्ना यांनी निरासरण केले तसेच सदर कार्यक्रमा मध्ये निर्भया पथक, पोस्को कायदया संदर्भात माहिती देण्यात आली, विदयार्थाना फेसबुक, हॉट्सऍप , तसेच इतर इंटरनेर चा वापर चांगल्या कामापुरताच करावा व सायबर क्राईम गुन्ह्या बाबत माहिती देण्यात आली.
डॉ.अनुष्का शिंदे यांनी स्वतःच्या संकल्पनेतून जुन्नर तालुक्यात सुरू केलेल्या ‘चला महत्वाचं बोलु थोडं….! या उपक्रमाअंतर्गत मुलींना लैगिक आकर्षन ,मासिक पाळी, शारीरिक विकास, शारीरिक बदल,प्रेम प्रकरण यावर मार्गदर्शन केले.यावेळी.डॉ.शिंदे म्हणाले की,प्रेम प्रकरणातून घरातून निघून जाण्याच्या घटना चिंताजनक आहेत.मुलगी ही आई वडिलांचा सामाजिक सन्मान आहे.आपल्या आईवडिलांचा सन्मान समाजात कायम टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक मुलीची आहे.कोणताही निर्णय घेताना, किंवा कोणतंही पाऊल उचलताना आईवडिलांशी मनमोकळेपणे बोला म्हणजे काही तरी मार्ग निघेल.कोणत्याही बाबतीत आई वडिलांना अंधारात ठेऊ नका.एखाद्या मुलीचा बाप कितीही दुबळा असूद्या त्याची मुलगी हीच त्या दुबळ्या बापाची खरी संपत्ती आणि इभ्रत आहे.भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे ,धोकादायक आणि करिअर उध्वस्त करू शकतात.डॉ.शिंदे यांनी कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थिनींना शपथ दिली.