निमगाव केतकी येथील सभेत खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन
रेडा- केंद्रात कॉंग्रेसचे सरकार अस्तित्वात होते, त्यावेळी जो विकास सामान्य जनतेपर्यंत पोहोचला त्या योजनांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला. आपल्या प्रमाणे कोणत्याही अभिनव योजना भाजप सरकारने या पाच वर्षात राबविल्या नाहीत. देशातील दुष्काळ हमीभाव व बेरोजगारी हटवण्यासाठी भाजपचे चुकीचे सरकार जनतेने हद्दपार करावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस तसेच मित्रपक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज इंदापूर तालुक्यातील विविध भागात सभा घेतल्या. निमगाव केतकी येथे पत्रकार परिषदेत सुळे बोलत होत्या. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रविण माने, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जि.प.सदस्य अभिजीत तांबिले, इंदापूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव, इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महारुद्र पाटील, बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, दिल्लीच्या संसद भवनात काम करताना, जी कामे केली आहेत, याच गुणवत्तेच्या आधारावर मी यशस्वी झाले आहे. दिल्लीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे, त्यामुळेच संसद रत्न पुरस्काराने आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला गौरवले आहे. हा गौरव लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेचा आहे.
पवार साहेबांना इंदापूर तालुक्यातील रोजच्या घडामोडी काही क्षणात थेट कळत असतात. या साऱ्या बातम्या निमगाव केतकी गावातूनच जातात, असे ऋणानुबंधाचे जाळे पवार कुटुंबीयांशी इंदापूर तालुक्याचे आहे. आमच्या सुख दुःखात इंदापूर तालुका सातत्याने खंबीरपणे पाठीशी राहिला आहे, अशीच साथ कायम राहील, असा आशावाद खासदार सुळे यांनी व्यक्त केला.