भीमा नदीला पूर आल्याने बोट अडकल्या
मांडवगण फराटा-मांडवगण फराटा ते कानगाव या दरम्यान असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन बोटी यंत्र अडकले असून त्या अडकलेल्या बोटी यंत्रांपासून येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेले पंधरा दिवसांपूर्वी देखील अशाच दोन वाळू उपसा करणाऱ्या बोट यंत्र अडकले होते; मात्र पुन्हा असा प्रकार घडल्यामुळे महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
सध्या भीमा नदीला चांगला पूर आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाहदेखील मोठ्या प्रमाणात वाहत आहे. अडकलेल्या तीन बोटी यंत्रापासून या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याला धोका निर्माण झाला तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.
या कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे मांडवगण फराटा, फराटे वाडी, पिंपळसुटी येथील शेती हिरवीगार झालेली आहे. भीमा नदीच्या उगमस्थानाकडे सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे भीमा नदीला मोठा पूर आलेला आहे. या पुराच्या पाण्यात वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी वाहत आलेल्या आहेत. या बोटी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत न जाता बंधाऱ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला जाऊन बंधारा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाळू उपसा करणाऱ्या या बोटी महसूल विभागाला कशा दिसल्या नाहीत असा प्रश्न ग्रामस्थ विचारात आहेत.
या गंभीर परिस्थितीकडे जलसंपदा विभाग डोळेझाक करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. वाळू उपसा करणाऱ्या तस्करावर कोण कारवाई करणार आहे हे लक्षात येत नाही. भविष्यात जर हा बंधारा फुटला तर या भागातील शेती धोक्यात येणार आहे. म्हणून हा बंधारा वाचवण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष देणे आवश्यक आहे.