औंध, दि.21(प्रतिनिधी)
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदा बैलगाडी शर्यत आयोजित केल्याबद्दल आयोजकांसह 7 ते 8 जणांवर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांनी दिली. आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी,चोराडे (ता खटाव) येथे युवराज गुलाबराव पिसाळ (रा.चोराडे,ता खटाव),योगेश अंजीर लाटे (रा.वाई),यांनी बैलगाडी शर्यतीचे बेकायदेशीर आयोजन केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांना मिळाली होती.
त्यानुसार औंध पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर चोराडे गावच्या हद्दीतील भांडमळा नावाच्या शिवारात धाड टाकली. त्यावेळी पोलिसांनी त्याठिकाणी बैलगाडी शर्यत सुरू असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी तिथे असलेल्या बैलगाडी चालक मालक विष्णू साहेबराव यादव (रा. भाकरवाडी,ता.कोरेगाव),नवनाथ बाबूराव पिसाळ, सचिन शांताराम जाधव, मयुरेश मनोहर पिसाळ (सर्व रा.चोराडे,ता खटाव), ऋषिकेश विश्वास साळुंखे, नवनाथ मारुती जगताप (दोघे रा. माळवाडी ता कराड) यांच्यासह आयोजक युवराज पिसाळ, योगेश लाटे, यांना ताब्यात घेतले.
त्यांना औंध पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कारवाई करून बैलांची वाहतूक करण्यासाठी वापरलेली दोन वाहने, शर्यतीसाठी आणलेला छकडा (बैलगाडी) असे सहा लाख सात हजाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई डीवायसपी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्यासह औंध पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.