टाकळी हाजी – जांबूत येथील शरदवाडी वडनेर हद्दीत दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन मेंढ्या व एक शेळी मृत्युमुखी पडली आहे. शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी साडे सहा वाजता ही घटना घडली.
मेंढपाळ सखाराम रामा करगळ हे ओढ्याच्या कडेला मेंढ्या चारत असताना बाजूला असलेल्या उसाच्या व मक्याच्या शेतातून अचानक दोन बिबट्यांनी हल्ला करीत एकापाठोपाठ तीन मेंढ्या व शेळीचा फडशा पाडला. करगळ यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्यांनी पळ काढला. या घटनेने करगळ यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा केला असल्याचे वन कर्मचारी विठ्ठल भुजबळ यांनी सांगितले.
बेट परिसरात बिबट्यांचे वास्तव्य वाढत असून त्यांच्या हल्ल्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे व त्यांचे कर्मचारी हे बेट विभागात भेट देवून लोकांनी सावधानता बाळगावी व काळजी घेण्याचे आव्हान करीत आहेत. वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा व पिंजऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सरपंच जयश्री जगताप यांनी केली आहे.