कॉंग्रेसचा सवाल: सरकारने ग्राहकांना लाभ मिळवून द्यावा
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनांचे दर नीचांकी पातळीवर गेले आहेत. असे असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी का केल्या जात नाहीत, असा सवाल मंगळवारी कॉंग्रेसने मोदी सरकारला केला.
कच्च्या इंधनांच्या दरांमधील घसरणीची बाब सद्यस्थितीत चांगलीच आहे. पण, सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर केव्हा कमी करणार, अशी विचारणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केली. कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीनंतरही मोदी सरकार स्तब्ध का आहे, असा सवाल त्यांन केला. कॉंग्रेसचे आणखी एक प्रवक्ते पवन खेडा यांनीही प्रतिक्रिया दिली. पेट्रोल आणि डिझेलवर मोठे उत्पादन शुल्क आकारून सरकारने मागील सहा वर्षांत 20 लाख कोटी रूपये कमावले. आता कच्च्या इंधनांच्या किमती नीचांकी पातळीवर पोहचल्या आहेत. त्याचा लाभ सरकारने देशातील ग्राहकांना मिळवून द्यावा, असे त्यांनी म्हटले.