खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या फॉर्मात : प्रशासनाचे तोंडावर बोट
पुणे – मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यात येत आहे. तर, दि.18 रोजी होणाऱ्या मतदानासाठी विदर्भ आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या मतदारांकडून खासगी बस वाहतूक कंपन्या थेट दुप्पट शुल्क आकारत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेकांनी आपला मतदानाला जाण्याचा बेत रद्द केला आहे. दरम्यान, यावर प्रशासन मात्र ढिम्म आहे.
राज्यात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. यात दुसऱ्या टप्प्यात अमरावती, अकोला, बुलडाणा (विदर्भ) नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड या लोकसभा मतदारसंघासह पश्चिम महाराष्ट्रतील सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तसेच नोकरीनिमित्ताने अनेकजण स्थलांतरित झाले असून त्यांचे मतदान अजूनही गावाकडेच आहे. त्यामुळे या मतदारांना खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. या बसेसचे बुकिंग मोठ्या प्रमाणात फुल झाल्याने आता तिकिटासाठी चौकशीला गेलेल्या मतदारांना या तिकिटदरवाढीच्या लुटीचा सामना करावा लागत आहे. या गावांसाठी पुण्यातून दररोज रात्री खासगी बस मोठ्या प्रमाणात जातात. त्यामुळे उन्हाळी आणि दिवाळी सुट्टीत या बसेसचे दर वाढविलेले असतात, तर नियमित दर 500 ते 700 रुपयांच्या आसपास असते. मात्र, आता लोकसभा निवडणुकीची संधी साधत या बस कंपन्यांनी तिकीट दर 800 ते 900 रुपयांवर नेले आहेत. त्यामुळे अनेकांनी आपला मतदानाचा बेत रद्द केला आहे. त्यामुळे एका बाजूला मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती होत असतनाच; त्याचा गैरफायदा घेणाऱ्या या प्रवृत्तीमुळे मतदानाच्या टक्केवारी घटत चालली आहे.
मतदार म्हणतात…
“मी लातूर जिल्ह्यातील आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी खासगी बस कंपनीकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी 500 रूपयांचे तिकिट 900 रुपये असे सांगितले. परत येण्यासाठी त्या पेक्षाही जास्त तिकीट सांगण्यात आले. त्यामुळे इतका खर्च होणार असल्याने मी मतदानाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका मतदाराने दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीशी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. माझ्यासह इतरांनाही हाच अनुभव असल्याचे ते म्हणाले.