उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश
मुंबई : मुंबईतील धोकादायक इमारतींच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावणी करत कोणतीही इमारत पडण्याची किंवा त्यात आग लागण्याची संकटे ही नोटीस देवून येत नाहीत त्यामुळे अशा इमारतीत राहणाऱ्या लोकांनी वेळीच इमारती रिकाम्या कराव्यात अशा सूचना न्यायालयाने केल्या. तसेच मुंबई शहर आणि उपनगरातील 30 वर्षांपुर्वीच्या इमारतींचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले आहेत.
मुंबईतील अनेक इमारती या खिळखिळ्या झाल्या असून त्या रिकाम्या करण्याचे आदेश पालिकेने नोटिसीतून नागरिकांना दिले मात्र, त्या नोटिसांकडे दुर्लक्ष करत न्यायालयात पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी जवळपास 50 याचिका दाखल केल्या आहेत. याच याचिकांवर सुनावणी करत न्यायमुर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमुर्ती संदीप शिंदे यांनी पालिकेला आदेश दिले.