मंचर-सर्वत्रच पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले असून उन्हामुळे झपाट्याने जमिनीतील पाणी आटू लागले आहे. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे पिण्यासाठी पाण्याचा शोध घेताना रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. वनखात्याने जंगलातील पाणवठ्यांत टॅंकरद्वारे पाण्याची साठवणूक करुन द्यावी, अशी मागणी बी. टी. बांगर यांनी केली आहे.
राज्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील पाणवठे आटु लागले असून जंगलातील वन्यप्राणी वस्तीकडे येऊ लागले आहेत. मनुष्य वस्तीकडे येणाऱ्या प्राण्यांमध्ये ससे, साप, कोल्हे, लांडगे, रानमांजरे अशा अनेक प्राण्यांचा समावेश आहे. जंगलातील पाणवठे आटल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मनुष्य वस्तीकडे येत आहेत. पाण्यात शोधात आलेल्या प्राण्यांनाही उघड्यावर असणारे पाणी पिता येते. मात्र जर उघड्यावर पाणी नसेल तर अनेक प्राणी विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात. त्यामुळे पाण्याच्या शोधात प्राण्यांचा बळी जात आहे. त्याचप्रमाणे लांडगे यांसारखे प्राणी मानवी वस्तीत आल्याने नागरिक प्राण्यांना घाबरत आहेत. उन्हाच्या झळया वाढू लागल्या असून जंगलातील पाणीसाठा कमी झाल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. पाण्याच्या शोधात आलेल्या वन्यप्राण्यांचा विहिरीत किंवा रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाणही सध्या वाढले आहे.