मोदींचा डॅशिंग पंतप्रधान म्हणून उल्लेख
चंडीगढ : पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) जनता नाराज आहे. त्यातून तेथील जनतेला भारताचा भाग बनायची इच्छा असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. त्यामुळे पाकिस्तानने पीओके भारताच्या ताब्यात सोपवावा, अशी भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी मांडली.
येथे पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख डॅशिंग म्हणून केला. मोदींनी जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तो निर्णय पचवणे पाकिस्तानला जड जात आहे. त्यामुळे काश्मीर मुद्दा लावून धरण्याचा अयशस्वी प्रयत्न तो देश करत आहे. मात्र, पीओके भारताकडे हस्तांतरित करणे पाकिस्तानच्याच हिताचे ठरेल. पीओके आमच्याकडे आल्यास आम्ही तिथे अनेक उद्योग उभारू. पाकिस्तानला आम्ही व्यापारात मदत करू. तसेच, गरिबी आणि बेरोजगारीशी लढण्यासाठीही आम्ही त्या देशाला सहाय्य करू, असेही आठवले यांनी म्हटले. पुढे बोलताना त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्तानने पोकळ धमक्या देऊ नये आणि युद्धज्वर निर्माण करू नये. भारतीय लष्कर मजबूत आहे. कारगिलसारख्या युद्धांमध्ये भारताने त्या देशाला हरवले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.