दुष्काळात द्राक्षबागांना शेततळ्याची मदत
रेडा- इंदापूर तालुक्यांमध्ये द्राक्षबागांच्या क्षेत्रांमध्ये दरवर्षी वाढ होऊ लागले आहे. तालुक्यांमध्ये द्राक्ष निर्यातीच्या सुविधा निर्माण झाल्यामुळे निर्यातक्षम रंगीत द्राक्ष लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून शेततळे खोदून टंचाईच्या काळात शाश्वत पाण्याचे स्रोत निर्माण करून भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी शेती करुन मोठ्या हिरारीने द्राक्षबागांचे कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत जुन्या द्राक्ष शेंडा आळी खुडून काडी तयार घेण्याच्या अवस्थेत आहेत, तर पहिल्या वर्षीच्या नवीन बाग ओलांडे तयार होऊन काडी सबकेन करण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. जून महिना सुरू होण्याअगोदर नवीन द्राक्ष बागावर प्रत्येक ओलांड्यावर आठ ते दहा काड्या तरी सब होऊन तयार असाव्यात, त्यादृष्टीने द्राक्ष बागायतदार यांची लगबग सुरू आहे. प्रखर उन्हामध्येही काडी तयार करण्याच्या कामामध्ये काटी, रेडा, रेडणी, वडापुरी, अवसरी, बेडशींग, बाभूळगाव परिसरातील बागायतदार व्यस्त असल्याचे दिसत आहेत.
यावेळी राजेंद्र वाघमोडे यांनी सांगितले की, महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्रमार्फत सर्व द्राक्ष बागायतदारांना लागवड ते बाजारपेठेपर्यंत सर्व तंत्रज्ञान पुरविले जाते. कृषी विद्यापीठ द्राक्ष संशोधन केंद्र व कृषी विभागाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान उच्च प्रतीची द्राक्षे तयार केले जाते. त्यामुळे तालुक्यातील तरुण शेतकरी द्राक्ष शेतीकडे झुकला असल्याने इंदापूर तालुक्यात येणाऱ्या काळात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले.