बरेली – देशात रोजगाराची कमतरता नाही. पण त्या नोकरींसाठी आवश्यक योग्य उमेदवारांची कमतरता असल्याचा दावा केंद्राने पुन्हा एकदा केला आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी हे स्पष्ट केले. तसेच विशेष करुन उत्तर भारतात चांगले शिक्षण घेतलेल्या युवकांची कमतरता आहे. उत्तर भारतात जे नोकर भरतीसाठी येतात. त्यांना आवश्यक असलेल्या कामासाठी त्या योग्यतेच्या व्यक्ती खूप कमी मिळतात, असे ते म्हणाले.
गंगवार हे आपल्या बरेली या लोकसभा मतदारसंघात बोलत होते. ते म्हणाले की, मी रोजगार मंत्रालय सांभाळतो. त्यामुळे वस्तुस्थिती मला माहीत आहे. वृत्तपत्रात जे दावे केले जातात ते वस्तुस्थितीला धरुन नाहीत. वृत्तपत्रात रोजगाराबाबत जे प्रसिद्ध केले जात आहेत. आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. पण जी गोष्ट आम्हाला समजली त्यावरुन मी इतकेच म्हणेन की देशात रोजगाराची कमतरता नाही. उलट अनेक संधी आहेत, असा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी रोजगार देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. रोजगार खूप आहेत आणि रोजगार कार्यालयांशिवाय आमचे मंत्रालयही यावर स्वतंत्र लक्ष ठेवून आहे. मी इतकेच म्हणेन की, रोजगाराची काहीच समस्या नाही.