मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.
कृषी कायद्यावरून शेतकरी आक्रमक आहेत. त्यांच्या मागण्या रास्ता आहेत. मात्र आज झालेल्या हिंसेवरून केंद्र सरकारची भूमिका चुकीची दिसत आहे. ही केंद्र सरकारची भूमिका असेल तर त्याचा आपण धिक्कार करतो, अशा शब्दांत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. तसेच आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी म्हटले.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली होती. राजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनात प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्राच्या जाचक कृषी कायद्यावरून येथील शेतकरी आक्रमक आहेत. वास्तविक पाहता देशाच्या इतिहासात पंजाब राज्याचे योगदान मोठे आहे. देशावर संकट आल्यानंतर सर्वप्रथम पंजाब राज्य पुढं असते. पंजाबचा विचार करता केंद्र सरकारने या आंदोलनाकडे सामंजस्याने पाहण्याची आवश्यकता शरद पवारांनी व्यक्त केली.