पुणे,दि.19
विमाननगर येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील बापलेकासह तीघांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर फरार झालेल्या कारचालकास विमानतळ पोलिसांनी अटक केली. एअरपोर्ट रोडवरील आकाशनगर येथे बुधवारी दि. 15 मे रोजी रात्री ही घटना घडली होती.
प्रमोद नानाजीराव कदम (50 , रा. त्रिदलनगर हौसिंग सोसायटी, मोझे शाळेसमोर येरवडा) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. या अपघातामध्ये दुचाकीचालक नरसय्या शेट्टी (37 ) आणि यशवंत शेट्टी (12 ) आणि अशपाक सय्यद (12 ) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मल्याद्री शेट्टी ( रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार आरोपीविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
नरसय्या शेट्टी हे त्यांचा मुलगा यशवंत आणि त्याचा मित्र अशपाक यांना दुचाकीवर बसवून येरवडा येथून कलवडस्तीकडे जात होते. यावेळी एअरपोर्ट रोडवर आकाश नगर भागात रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन तीघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालकाने कारसह तेथून पलायन केले होते.