ग्राउंड रिपोर्ट शिरूर लोकसभा मतदारसंघ
पाबळ-शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या दोन पक्षात खरी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे डॉ. अमोल कोल्हे निवडणूक लढवत असताना विरोधी उमेदवार म्हणून खासदार शिवाजीराव आढळराव हे निवडणूक लढवत आहेत. असे असले तरी त्यांची खरी लढत शिरूर आंबेगावचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांच्याशी होणार असल्याचे त्रिवार सत्य आहे. त्यादृष्टीने शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस “सावधान’ करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच या निवडणुकीत खासदार आढळरावांचा “चौकार’ होतो का, वळसे पाटील त्यांचा “त्रिफळा’ उडवणार हे स्पष्ट होणार आहे.
गेल्या तीनही लोकसभा निवडणुकीत खासदार आढळराव यांना वाढत्या मताधिक्याने विजय मिळत गेला. तर शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदार संघात दिलीप वळसे पाटील यांनाही विजय मिळत गेला. गत निवडणुकीत तब्बल साठ हजाराचे मताधिक्य वळसे पाटील यांना मिळाले होते. हीच बाब ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनात खदखदत असल्याने यावेळी काहीही झाले तरी शिरूर-आंबेगावमधून तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त मताधिक्य द्यायचेच असा विडाच राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उचलला आहे. यासाठी या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, गरम पंचायतीचे सदस्य कामाला लागले असून त्याला अशोक पवार, प्रदीप कंद, मंगलदास बांदल या दिग्गजांची साथ मिळत आहे. या सर्वच कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली असून, सहानुभूतीच्या लाटेत अडकलेल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे काम सुरु आहे.
- वळसे पाटीलांची रोखठोक भूमिका
दरम्यान प्रचार सभेत भाषण करताना वळसे पाटील यांनी यावेळी डॉ.अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी रोख ठोक भूमिका मांडल्याने कार्यकर्त्यांसह मतदारांनाही योग्य तो संदेश गेल्याचे दिसत असून उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभांना होणारी मोठी गर्दी तसेच भाषणात व्यक्त होणारा निश्चित आशावाद व तसेच वळसे पाटील यांना मानणारा मतदार असल्याने या निवडणुकीत शिरूर-आंबेगाव मधून मोठे मताधिक्य देणारच, असा विश्वास व्यक्त लहान मोठ्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.