चिखली अत्याचार प्रकरण; बुलढाणा सत्र न्यायालयाचा निकाल
सातारा, दि.14 (प्रतिनिधी)
27 एप्रिल 2019 रोजी रात्री अंदाजे एक ते दोन वाजण्याच्या सुमारास आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला स्कुटीवरुन पळवून नेत स्मशानभूमी समोरील मोकळ्या जागेत आळी-पाळीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना चिखली (बुलढाणा) येथे घडला होता. याप्रकरणी चिखलीचे तत्कालीन डीवायएसपी व सध्या वडूज येथे कार्यरत असलेले बी.बी.महामुनी यांनी केलेला तपास ग्राह्य धरून बुलढाणा येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी आरोपी सागर विश्वनाथ बोरकर व निखील लिंबाज गोलाईत यांना फाशीची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुलडाण्यातील चिखली येथील एका 9 वर्षीय मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करुन जबर जखमी करण्यात आले होते.27 एप्रिल 2019 रोजी हा प्रकार घडला होता. 27 रोजी रात्री अंदाजे एक ते दोन वाजेच्या सुमारास आरोपींनी अल्पवयीन मुलीला स्कुटीवरुन पळवून नेले होते. आणि स्मशानभूमी समोरील मोकळ्या जागेत आळी-पाळीने तिच्यावर अत्याचार केला होता.
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडीलांनी त्याच दिवशी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर डीवायएपी बी.बी.महामुनी यांनी तपास करून दोन्ही आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
या प्रकरणाचा प्राथमिक तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव वाघ यांनी केला होता. मात्र, ऍट्रॉसिटीचे कलम वाढल्याने त्यानंतरचा तपास चिखलीचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी.महामुनी यांनी केला होता.
महामुनी यांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याची सुनावणी न्यायाधीश चित्रा हंकारे यांच्यापुढे सुरू होती. या खटल्यात सरकारी पक्षाने साक्षीदार शिवाजी साळवे, शुभम भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कदम, डॉ. विजय खरपास, डॉ. मनिषा चव्हाण, डॉ. नुतन काळे, तसेच औरंगाबाद येथील तज्ज्ञ डॉ. विजय कल्याणकर, डॉ. संजय पगारे, जात प्रमाणपत्रावरील साक्षीदार रवी टाले, राजू देशमुख,नायब तहसीलदार कुणाल झाल्टे, तपास अधिकारी गुलाबराव वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी.महामुनी या साक्षीदारांसह पीडीत मूलीचा जबाब पुरावा म्हणून नोंदवण्यात आला.
साक्षी पुरावे हे घटनेला पुरक व एकमेकाशी सुसंगत असल्याने पीडित मुलीवर आरोपींनी बलात्कार केल्याचे महामुनी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या साक्षीत न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील ऍड. भटकर, ऍड. सोनाली सावजी यांनी काम पाहिले.
… म्हणून आरोपींना फाशी
सदर घटना घडली तेव्हा त्या परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे आरोपींना अटक करणे,तपास करून त्यांना शिक्षेपर्यंत पोहचवणे मोठे दिव्य होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून मी व सर्व सहकारी काहीही झाले तरी तपासात त्रुटी राहून आरोपींना त्याचा फायदा होणार नाही यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होतो. तत्कालीन वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टिम वर्क केल्यानेच आरोपींना फाशी झाल्याचे डीवायएसपी बी.बी.महामुनी यांनी सांगितले.