राजगुरूनगर-टोकावडे (ता. खेड) येथे मुसळधार पावसात गोपाळे वस्तीकडे जाणार ओढ्यावरील नवीन बंधाऱ्याचा भराव वाहून गेला आहे.
टोकावडे गावात जाणाऱ्या गोपाळेवस्ती जवळील पूल कम बंधाऱ्याचा एका बाजूचा भराव मुसळधार पावसात वाहून गेल्याने जाण्या-येण्याची मोठी गैरसोय झाली आहे. या पुलावरून कारकुडी, टोकावडे या दोन गावांना जाण्या-येण्यासाठी हा पूल येथील ओढ्यावर बांधण्यात आला होता. शनिवारी झालेल्या जोरदार पावसात या पुलाचा एक भाग वाहून गेला आहे. यामुळे गोपाळे वस्ती टोकावडे व कारकुडी गावाकडे जाता येत नाही. या पुलाची उंची कमी असल्याने आणि ओढ्याला आलेल्या मोठ्या पुरामुळे पुलाच्या एका बाजूने पाणी गेले, त्यात हा भराव वाहून गेला आहे. पूल बांधताना तो नियोजनबद्ध न बांधल्याने भविष्यात अशा पुरामध्ये या पुलाचे दोनी बाजूकडील भराव वाहून जाण्याचा धोका आहे. या पुलाची पाऊस उघडताच तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.