भामा आसखेड प्रकल्पग्रस्त 22 गावांचा इशारा
शिंदे वासुली- भामा आसखेडग्रस्तांचे आंदोलन निर्णायक टप्प्यावर असताना शासनाने आर्थिक पॅकेजचे मृगजळ दाखवून आंदोलनात तेढ निर्माण करीत आहेत. 388 शेतकऱ्यांना पर्यायी जमीन वाटप प्रक्रियेबाबत आठ दिवसांत ठोस निर्णय घेतला नाही, तर 22 गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकरी आंदोलन करून जॅकवेलचे काम पुन्हा बंद करणार असल्याचा इशारा प्रगल्पग्रस्तांनी दिला आहे.
करंजविहीरे (ता. खेड) येथे भामाआसखेड प्रकल्ग्रपस्तांची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी आंदोलन प्रमुख सत्यवान नवले, देविदास बांदल, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, माजी सभापती बन्सू होले, बळवंत डांगरे, दत्ता रौंधळ, किरण चोरघे, गणेश जाधव, अरुण सावंत, दत्ता होले, चंद्रकांत शिंदे, देवदास जाधव, बाळासाहेब पापळ, निवृत्ती नवले, तानाजी नवले, किसन नवले यांच्यासह चार-पाचशे प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
आढावा बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी, शासनाकडून देण्यात येत असलेल्या आर्थिक पॅकेजचे धनादेश वाटपात भ्रष्टाचार व वशिलेबाजीचा आरोप केला. शिवाय गरीब आणि साधे भोळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीचा मोबदला घेण्यासाठी पुण्याला हेलपाटे मारावे लागतात. म्हणून आंदोलन प्रमुख सत्यवान नवले यांनी पुण्यात होणारी मोबदला वाटप प्रक्रिया थांबवून करंजविहीरे येथे शिबीर घ्यावे. व एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना धनादेश देण्याची मागणी केली. काही शेतकऱ्यांनी पुण्याच्या ऑफिसात एजंटांचा सुळसुळाट असून आमच्यापेक्षा एजंट व भांडवलदारांचीच जमीन व मोबदल्याची कामे होतात.
सोमवारी जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देणार
भामा आसखेड प्रकल्ग्रपस्त शेतकरी आता वारंवार मिटींग, बैठका घेऊन वैतागलेले दिसतात. म्हणून त्यांनी अखेरचे एकच आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी केलेला आहे. सोमवारी पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. निवेदन दिल्यानंतर शासनाकडून ठोस कार्यवाही झाली नाही तर पुन्हा एकदा पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलचे काम बंद पाडण्याचा सज्जड इशारा दिला आहे. आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत एक किमी जलवाहिनीचे काम बंद ठेवण्यावर प्रकल्ग्रपस्त शेतकरी ठाम आहेत.
प्रमुख मागण्या
* आर्थिक पॅकेज धनादेश वाटप करंजविहीरे येथे करणे
* 610 शेतकऱ्यांना पर्यायी जमीन वाटप करणे
* न्यायालयात न गेलेल्या शेतकऱ्यांना खास बाब आर्थिक मोबदला देणे
* धरणातील पाणीवाटपाचे फेर नियोजन करणे