आळंदी -जीवघेणी अतिक्रमणे व वास्तू हटविण्याबाबत आळंदी नगरपरिषद प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे.
नगरपालिका हद्दीत असणाऱ्या मरकळ रोड ( लक्ष्मी माता चौक) येथे पाण्याच्या दोन टाक्या आहेत. पाण्याच्या टाकी पासून 200 मीटर दूर कोणतीही वास्तू, व्यापारी गाळे, टपरी व इतर व्यवसाय करता येत नाही. तरीदेखील आळंदी नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीखाली दोन-तीन गाळे छोट्या-मोठ्या टपऱ्या व इतर व्यवसाय दोनशे फुटाच्या आत म्हणजेच जवळजवळ टाकीखाली बिनदिक्कतपणे सुरू आहेत. यावर पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, भविष्यात त्यामुळे तेथे असणारे गाळे भाजीविक्रेते फळविक्रेते व इतर व्यावसायिक यांच्या जीवाला कधीही धोका होऊ शकतो. याची जबाबदारी आळंदी नगरपरिषदेने उचलवयास हवी, एवढेच नव्हे तर आळंदी पालिकेने टाकीच्या आजूबाजूचा परिसर हा दोनशे फूट अंतराच्या बाहेरपर्यंत मोकळा करावा अन्यथा मोठी जीवितहानी झाल्यास आळंदी पालिकेस जबाबदारी घ्यावी लागेल. तरी पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे धोरण अवलंबून ताबडतोब टाकीचा परिसर नियमानुसार मोकळा करून घ्यावा व भविष्यात होणारी मनुष्य हानी, दुर्घटना टाळावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
याबाबत आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भुमकर यांच्याशी संपर्क साधला असता ते नॉटरिचेअबल होते, तर बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता संघपाल गायकवाड यांचा फोन बंद होता.
- बार्शीचा धडा घ्यावा
बार्शी येथील शौचालयाची भिंत कोसळून भाजीविक्रेत्या महिलेचा (सन 2015मध्ये) मृत्यू झाला होता. त्यास बार्शी नगर परिषद जबाबदार असून, त्याची जबाबदारीही बार्शी नगरपरिषदेने स्वीकारली होती; मात्र बार्शी नगर परिषदेकडून सदर महिलेस नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यानुसार मृत महिलेचा भाऊ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सुनावणी देत न्यायालयाने या महिलेस दोन लाख रुपये अंतरिम नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आदेश काढला. - हे काम मुख्याधिकारी, बांधकाम तसेच अतिक्रमण विभाग यांचे आहे. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही; मात्र भविष्यात उद्भवणाऱ्या अशा दुर्घटना घडू नयेत, असे आम्हां लोकप्रतिनिधींना वाटते. प्रशासनाने त्यांच्या स्तरावर कारवाई करून अशी जीवघेणी अतिक्रमणे वेळीच काढून टाकावित.
-वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्षा