नगर -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने “माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे ठरविले असून, जिल्ह्यात मंगळवार (दि.15) पासून या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेत करोनादूतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन, प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करावी. आणि आजारी तसेच लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत. या मोहिमेतून करोनाला हद्दपार करुन विजयादशमीच्या मुहुर्तावर करोनारुपी रावणाचे दहन करण्याचा संकल्प करुया. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्ह्यात “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानास प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुश्रीफ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सूचना केल्या. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी प्रमुख अधिकारी या दरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, राज्यातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गृहभेटी, तपासणी आणि कोमॉर्बीड आजारी व्यक्तींना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण राज्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी राबविण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यात घरोघरी ही मोहिम राबवा. जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिका, ग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करुन त्यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सर्व लोकप्रतिनिधी, मनपा आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती यांचे पदाधिकारी,सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच-सदस्य, अधिकारी-कर्मचारी सर्वांनी या मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे.
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करुन सुरुवातीच्या टप्प्यातच संशयित रुग्णांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना उपचार उपलब्ध करुन देणे यास प्राधान्य देण्यात येत आहेत. लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गृहभेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी आणि 2 स्वयंसेवक असे तिघांचे पथक असेल. एक पथक 1 दिवसात 50 घरांना भेटी देईल. पहिली फेरी 15 दिवस असे गृहीत धरुन पथकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे.
दोन टप्प्यांत राबविणार मोहीम
माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम दोन टप्प्यात होणार असून मोहीमेची पहिली फेरी 15 ते दि.10 सप्टेंबर या कालावधीमध्ये होईल आणि दुसरी फेरी दि.14 ते 24 सप्टेंबर या कालावधीमध्ये होईल. पहिला फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असेल तर दुसऱ्या फेरीचा कालावधी 10 दिवसांचा राहणार आहे. सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि पदाधिकारी, नागरिक यांनी याकामी योगदान देऊन जिल्ह्यातील करोना प्रादुर्भाव संपुष्टात आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन मुश्रीफ यांनी केले.