सुमित्र माडगुळकर : वसंत व्याख्यानमालेत साधला संवाद
पुणे – आधुनिक युगातही संस्कार, प्रतिभा, भविष्यवेध आदी गुणांना नटलेले गदिमांचे साहित्य अजरामर ठरले आहे. अशा ध्येयाने झपाटलेल्या गदिमांची प्रतिमा ही उगवत्या सूर्याची विविध रूपे असल्याचे मत गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर यांनी व्यक्त केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत राजेश दामले यांनी साधलेल्या संवादात सुमित्र माडगुळकर यांनी गदिमांचे किस्से सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ध्वनिफित आणि चित्रफितीद्वारे गदिमांची गीते श्रोत्यांनी अनुभवली. या मुलाखतीमध्ये गदिमांचे बालपण, शिक्षण, चित्रपट निर्मिती करतानाच्या आठवणी, गीतरामायण आदी घटनांबाबत सुमित्र यांनी गदिमांच्या आठवणींना उजाळा दिला.
“वंदे मातरम’ या चित्रपटाची आठवण सांगताना सुमित्र माडगुळकर म्हणाले, “गदिमा, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे यांनी चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनांचा अभाव असतानाही चित्रपटांची निर्मिती केली. त्याच कालखंडात झालेल्या गांधीच्या हत्येनंतर सर्वत्र दंगल सुरू झाली. त्याचवेळी राम गबाळे आणि गदिमा प्रवास करत असताना त्यांची गाडी अडवण्यात आली. चित्रपटाचे पोस्टर, झेंडे दाखवत 1942 च्या लढ्यावर आधारित चित्रपट काढत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. या घटनेनंतर वंदे मातरम् हा चित्रपट प्रदर्शित झाला. ही भविष्यवेधक विचारधाराच कामाला आली. अन्यथा वंदे मातरम् चित्रपट उदयासदेखील आला नसता,’ असेही त्यांनी नमूद केले.