चिंबळी- यंदा 1972 पेक्षाही मोठा दुष्काळ पडल्याने पाण्याचे जवळपास सर्वच स्त्रोत अटले आहेत. तर पुढील वर्षी ही परिस्थिती उद्भावू नये म्हणून खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक जणांनी पावसाळ्यापूर्वी घर, शेत परिसरात विहीर, बोअरवेल घेण्याकडे कल दर्शवला आहे. सध्या खेड तालुक्यात पाणीटंचाईने कळस गाठला असून अनेक गावे, वाड्या-वस्त्यांना पाण्याचे टॅंकर असूनही लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यातच शेत पिकांनाही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी एक ते दीड लाख रुपये खर्च करून विहीर खोदत आहेत. तर पिण्याच्या पाण्यासाठी 35 ते 40 हजार रुपये खर्च करून 100 ते 150 फूट बोअरवेल घेत आहेत. दरम्यन, भूगर्भातील पाणीपातळी खोलवर गेल्याने या बोअरवेल व विहिरांना पाणी लागत नसून केवळ धुराळाच उडतो आहे. मात्र, पावसाळ्यात या विहिरी व बोअरवेलमध्ये पाणी खळखळेल असा विश्वास शेतकऱ्यांना असल्याने ते खर्च करीत आहेत.