तिरुअनंतपुरम – केरळच्या किनारपट्टीवर इसीस (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या हालचाली वाढत आहे. श्रीलंकेमार्गे केरळमध्ये 15 दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यानंतर केरळसह संपूर्ण भारतात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंका बॉम्बस्फोटानंतर केरळमध्ये गुप्तचर यंत्रणेकडून सातत्याने अलर्ट करण्यात येत होते. मात्र शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी लक्षद्वीमार्गे केरळ किनारपट्टीवर एक बोट पाहिली. या बोटीत 15 दहशतवादी असल्याचा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. या संशंयानंतर गुप्तचर यंत्रणांनी केरळ पोलिसांना किनारपट्टीवरील सुरक्षेत वाढ करण्याचा आदेश दिले आहे. तसेच संपूर्ण भारतात हाय अलर्टही जारी करण्यात आला आहे.
याप्रकरणी केरळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत किनारपट्टी भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ पोलिसांचे एक पथक किनारपट्टीजवळ तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय किनारपट्टीवर मासेमारीसाठी येणाऱ्या प्रत्येक मच्छिमाराचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात 21 एप्रिलला श्रीलंकेत भीषण साखळी स्फोट झाला होता. या साखळी स्फोटात सुमारे 350 नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर श्रीलंकन आर्मीकडून 15 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. हे सर्व दहशतवादी इसिसचे असल्याचे सांगितले जात होते.
त्यानंतर केरळमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पालक्काड येथून 29 वर्षीय तरुणाला अटक केली होती. या तरुणाचा श्रीलंका हल्ल्याप्रमाणे केरळमध्ये स्फोट घडवण्याचा कट होतो.