फळ खराब होऊ नये म्हणून कापडाची अच्छादने
वालचंदनगर- इंदापूर तालुक्यात अंदाजे 15 हजार एकरात डाळींबाची लागवड करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेपासून बागांचे रक्षण व्हावे, याकरिता संपूर्ण बागेवर कापडाची अच्छादने टाकण्यात आली आहेत.
इंदापूर तालुक्यात शेततळे योजनेच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांनी शेततळी बांधली आहेत. जिरायती भागात तसेच मुरमाड जमिनीत डाळिंब चांगले येत असल्याने अशा भागात डाळिंबाच्या बागा बहरू लागल्या होत्या. मात्र, गेल्या तीन, चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत नसल्याने शेततळ्यांतही समाधानकार पाणीसाठा होत नसल्याने तसेच भुगर्भातील पाणी पातळीही खालावली असल्याने फळबागा जगविणे शेतकऱ्यांना आव्हान ठरत आहे.
एप्रिल महिन्यात तालुक्यात तापमान जवळजवळ 40 अंशावर पोहचले असल्याने शेततळ्यातील पाण्याचेही बाष्पिभवन होत आहे. डिसेंबर महिन्यापासून पाणी पातळीत घट होऊ लागली असताना एप्रिल महिन्यांत तालुक्यातील बहुतांशी शेततळी आटली आहेत. लाखो रूपये खर्च करून फुलविलेल्या डाळिंब बागा जगविण्याकरिता शेतकरी वेगवेगळ्या कल्पकतेचा वापर करीत आहेत. यातूनच उष्णतेपासून बचाव करण्यारिता तसेच दिलेल्या पाण्याचे बाष्प होऊ नये, याकरिता संपुर्ण बागांवरच मात करण्यासाठी साड्यांचे अच्छादन टाकण्याचा फंडा शेतकऱ्यांनी शोधून काढला आहे.