जामखेड: दोन वर्षांपासून डॉ. विखेंच्या कारखान्यातील यंत्रणा दक्षिण भागात फिरत आहे. मात्र कारखान्याच्या कामगारांचे कित्येक महिने पगारच झाले नाहीत. त्यामुळे तुमचेच चांगले चाललंय का, मग दक्षिणेचे चांगले कसे करणार, असे टीकास्त्र डॉ. सुजय विखे यांच्यावर सोडत उत्तरेतून आलेली यंत्रणा परत पाठवा, असा सल्ला माजी महसूलमंत्री तथा कॉंग्रेसचे केंद्रिय समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी जामखेड येथील कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला.
शहरातील महावीर मंगल कार्यालयात आज कॉंग्रेसचे केंद्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत जामखेड तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण ससाणे, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ज्ञानदेव वाफारे, कॉंग्रेसचे युवा नेते रमेश आजबे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, माजी पं. स. सदस्य शरद कार्ले, कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष जमीर सय्यद, माणिकराव मोरे, भानुदास बोराटे, अंकुश उगले, शिवाजी काटकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योतीताई गोलेकार, हिंदुराज मुळे, ऍड. महारुद्र नागरगोजे, विशाल डुचे, शंकरराव काशिद, राहुल उगले, जेष्ठ नेते गजानन फुटाणे, कुंडल राळेभात, शिवाजी सातव, अशोक पाटील सह आनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, जामखेडमधील जुने कॉंग्रेस सोडून गेले. त्यामुळेच नव्यांना पक्षात संधी मिळाली. आता या संधीचे नविन पदाधिकाऱ्यांनी सोने करा. कॉंग्रेस हा गरिबांच्या भावना जानून घेणारा पक्ष आहे. त्यामुळे गोरगरिबांपर्यंत पोहचा. कॉंग्रेसने व लोकशाहीने गरिबांना जगण्याचा आधिकार दिला आहे, तर युती सरकारने श्रीमंतांनाच मोठे केले आहे. लोकशाही वाचवायची असेल, तर कॉंग्रेसला साथ द्या. युतीचे सरकार अपयशी असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवे चेहरे उभे केले आहेत. सत्तेत आल्यावर राहुल गांधी यांच्या वार्षिक 72 हजार रुपये देण्याची योजना ही फायदेशीर असून यामुळे गरिबांची मोठी आर्थिक उलाढाल होईल, असे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नवीन व जुने जे पक्षात आहेत, त्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा सल्ला देखील आ. थोरात यांनी दिला.