“नीराभीमा’च्या भेटीत जानकरांकडून पाटलांचे भरभरून कौतूक
रेडा – भाजपचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे इंदापुरात आल्याचे तसेच ते निरा भिमा कारखान्यावर जाणार असल्याची वार्ता तालुक्यात पसरल्यानंतर माजीमंत्री हर्षवर्धन पाटील आणि मंत्री जानकर यांच्यात महत्त्वाचा निर्णय होणार, अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे इंदापुरातील अनेकांनी कान टवकारले होते. परंतु, त्याच दरम्यान मंत्री जानकर यांनी थेट शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील कारखानाची चारा छावणी गाठली. आगामी काळात चारा उपलब्ध होईपर्यंत छावण्या सुरू राहणार राहतील, अशी ग्वाही याभेटीप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिली.
या छावणी भेटीनंतर मंत्री महादेव जानकर यांचा कारखान्यावर अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळीही निरा भिमा कारखान्याची कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची उत्कृष्टपणे प्रगती सुरू असल्याचे मंत्री जानकर यांनी सांगितले. तात्कालिक संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव देशमुख व पतंगराव कदम यांनी मी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळ कामकाजाबाबत मार्गदर्शन केल्याची आठवणही जानकर यांनी नमूद केली. मुंबईत दिमाखात पार पडलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या “विधानगाथा’ पुस्तक सोहळ्यास सर्व पक्षांची नेते मंडळी फक्त हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच एकत्र आली होती, असेही गौरवोद्गारही मंत्री जानकर यांनी काढले. यावेळी जानकर यांनी पाटील यांच्या कामाचे भरभरून कौतुकही केले. त्यामुळे अनेकांनी तर्क वितर्क लावायलाही सुरवात केली. यावेळी महादेव जानकर यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. तर, कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी मंत्री जानकर यांना कारखाना तसेच चारा छावणीविषयी सर्व माहिती दिली.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे, धनंजय कोरटकर, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, दिलिपराव ढोले, सुरेश मेहेर, श्रीमंत ढोले, दादासाहेब केसकर, किरण गोफणे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
- राज्यातील चारा छावण्यांत मध्यंतरी शेतकऱ्यांना 15 कि. चारा दिला जात होता. परंतु, तो अपुरा पडत असल्याने 18 कि. चारा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. भूमिहीन शेतकऱ्यांची जनावरे छावणीत दाखल करून घेण्यासाठी पशुसंवर्धन अधिकाऱ्याचा दाखला ग्राह्य धरण्याचा शासकीय आदेश लवकरच काढण्यात येईल, असे मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.